हिंगोली – भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी सभापती दिनकरराव देशमुख यांनी आज (दि.२०) एप्रिल शनिवार रोजी वसमत येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना नेते तथा विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे व हिंगोली संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला. हा भाजपला हिंगोली विधानसभेत मोठा धक्का मानला जात आहे.
(दि.२४) एप्रिल रोजी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हदगाव येथील विराट प्रचार सभेत देशमुख यांच्या असंख्य समर्थकासह भाजपा पदाधिकारीऱ्यांचा जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती, देशमुख यांनी दिली.
दिनकरराव देशमुख यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या समर्थकासह शिवसेना (उ.बा.ठा) पक्षात जाहीर प्रवेश केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना हिंगोली विधानसभेत मोठे मताधिक्य मिळेल, असे राजकीय वर्तुळातून बोलल्या जात आहे.
देशमुख यांनी शिवसेनेत अनेक पदावर काम केले असून हिंगोली विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असल्याने व वेळोवेळी शिवसेनेत शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आंदोलने करुन न्याय देऊन शिवसेना पक्ष वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न केले होते. देशमुख हे स्वगृही परतल्याने शिवसैनिकामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
यावेळी हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुखसह संपर्कप्रमुख सुनिल काळे, उप जिल्हाप्रमुख गणेश शिंदे,अनिल कदम, माजी सरपंच रामगोपाल भाऊ गट्टाणी, दिलीपराव देशमुख, माजी कृ.उ.बा.समिती संचालक नारायण झाडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.