हिमांशू
देशाची “इंडिया’ आणि “भारत’ अशी विभागणी झाल्याचं बऱ्याच वर्षांपासून बोललं जात असलं तरी अनेकजण ते फारसं मनावर घेत नाहीत. काहीजणांना हे मान्य नाही तर काहींना माहीतसुद्धा नाही. करोनाची साथ आणि त्यानंतर बदलत चाललेली जीवनशैली या पार्श्वभूमीवर तर ही विभागणी अधिक ठळक झाली आहे. उदाहरणार्थ, एकीकडे ऑनलाइन शिक्षण यापुढे अपरिहार्य असल्याचं बोललं जातंय तर दुसरीकडे “ऑनलाइन शिक्षण म्हंजी काय रं भाऊ?’ अशी असंख्य लोकांची परिस्थिती आहे.
एकीकडे लॉकडाऊनमध्ये पूर्णवेळ ऑनलाइन राहून अनेकांनी स्वतःचं मनोरंजन करून घेतलं तर दुसरीकडे पोटापाण्याला महत्त्व देऊन साथीचा धोका पत्करावा की हातचं काम सोडून गावी जावं या चिंतेत असंख्य लोकांना मनोरंजन हा शब्दही आठवला नाही.
लॉकडाऊनच्या काळात नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम वगैरे अनेकांच्या कुटुंबाचे सदस्य झालेत तर दुसरीकडे जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकलेला असतानासुद्धा फोन लागत नाहीत अशी अवस्था आहे. दोन संपूर्ण स्वतंत्र दुनिया पाहायला मिळतायत आणि त्यामुळे एका दुनियेत घडणाऱ्या घटना दुसऱ्या दुनियेतल्या लोकांना धक्कादायक वाटतायत. 1960-70 च्या दशकांमधल्या चित्रपटांत जी दृश्यं दिसायची, त्यात अनेकांना मेलोड्रामा दिसतो. त्याही काळात असं काही घडलं असेल यावर आज कुणाचा विश्वास बसत नाही. परंतु आजही तशा घटना पडद्यावर नव्हे तर प्रत्यक्षात घडतात, तेव्हा धक्का बसतो.
सावकारी पाश या विषयावर पूर्वीपासून खूप लिहिलं, बोललं गेलंय आणि सिनेमा-नाटकांमध्येही त्याचं दर्शन घडलंय. परंतु प्रत्यक्षात सावकारी असते कशी, याबद्दल कुणालाच फारशी माहिती नसते. सावकारी अधिनियम लागू होऊन बरीच वर्षं झाली असल्यामुळे हातउसने पैसे घेणं आणि त्याची अनेक पटींनी परतफेड करण्यात काय वेदना असतात, याची कल्पना आपल्याला नसते. सावकाराच्या कर्जाची परतफेड म्हणजे घागरीनं विहिरीत पाणी भरत राहणं. विहीर कधीच भरत नाही आणि पिढ्यांमागून पिढ्या कर्जदार बनत राहतात. अखेर कर्जापायी शेतकऱ्याला आपली जमीन गमवावी लागते, हे नेटफ्लिक्सवर अभावानंच दिसत असेल.
परंतु कर्जाच्या कारणातून नागपूर जिल्ह्यात सावकाराच्या पत्नीनं शेतकऱ्याच्या पत्नीचीकेलेली बेअब्रू हे वस्तुतः आपल्या व्यवस्थेचं वस्त्रहरण आहे, असंच म्हणावं लागतं. चीड आणणारी गोष्ट म्हणजे या बेअब्रूचं दृश्य सावकार त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत राहिला. शेतकऱ्याची अगतिकता ओळखून कोणत्याही कागदावर त्याचे अंगठे घ्यायचे आणि नंतर त्याची शेती हडपायची, ही घटना तीस-चाळीस वर्षांपूर्वी खरी वाटली असती; पण आजही ती घडली हे वस्त्रहरणच! एकीकडे बॅंकांनी पीककर्ज न दिल्यास फौजदारी दाखल केली जाईल, अशी तंबी सरकारकडून दिली जाते आणि दुसरीकडे ही घटना घडते!
प्राप्त माहितीनुसार, कर्ज देणाऱ्याची सावकारी अवैध आहे. कर्जाची रक्कम दोन लाख होती अशीही माहिती मिळाली आहे. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार कर्ज आणि व्याजापोटी त्याने बरीच रक्कम आतापर्यंत फेडली आहे. परंतु तरीही शेतकऱ्याची पत्नी शेतात काम करीत असताना सावकाराने त्या जमिनीवर हक्क सांगितला. सावकाराच्या पत्नीच्या नावे जमिनीचे विक्रीपत्र पाहून शेतकऱ्याला धक्काच बसला. त्यातून बाचाबाची, धक्काबुक्कीबरोबरच शेतकऱ्याच्या पत्नीची बेअब्रू करण्याचा हिणकस प्रकार घडला. हा आहे आमच्या अन्नदात्याचा वर्तमान!