अरुण गोखले
माणूस माणसं जोडत गेला आणि त्याचं कुटुंब तयार झालं. अनेक कुटुंब एकत्र आली आणि त्यांचा समाज निर्माण झाला. अनेक जाती, धर्म, पंथ आणि सांप्रदायाच्या अनेक कुटुंबाचा एक विस्तारित समूह म्हणजेच समाज.
ज्याप्रमाणे माणसा-माणसांत आणि कुटुंबात प्रेम, आस्था, जिव्हाळा, आपुलकी, आपलेपणा असतो तसाच तो समाजातही असतो. यालाच आपण आपले “समाजप्रेम’ किंवा “आस्था’ असे म्हणतो. समाज हा माणसाला “स्व’ पासून मी, माझे, आपले आणि आपल्या सर्वांचे असा व्यापक विचार करायला शिकवतो.
आपल्या साधू, संतांनी, सद्गुरूंनी आपल्याला “हे ईश्वरा! सर्वांचे भले कर’ अशी प्रार्थना करायला शिकविले आहे किंवा “जगा आणि जगू द्या’ किंवा “जगवा’ हा जो संदेश दिला आहे, त्यातही समाजाबद्दलची प्रेमभावनाच अभिप्रेत आहे.
प्रेम माणसाला त्याग शिकवते. प्रेम माणसाला परस्परातले भेद विसरायला शिकविते. प्रेम आपल्याला एकमेकांसाठी जगायला आणि प्रसंगी मरायलाही शिकविते. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मदत का करते? त्याला आधाराचा हात का देते? त्याला आपल्या घासातला घास का खाऊ घालते? तर त्याचं उत्तर एकच- व्यक्ती व्यक्तीतील असलेले समाजप्रेम.
हे प्रेम जात, धर्म पाहात नाही, ते गरीब-श्रीमंतीचा विचार करत नाही, स्त्री पुरुष, काळा गोरा हा भेद राखत नाही. तर आपल्या सहृदयतेनेच प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या समाजबांधवांना शक्य त्या प्रकारची मदत करीत असतो.
सध्याच्या सामाजिक बिकट परिस्थितीत असे समाज जगविणारे आणि सामाजिक एकता टिकवणारे अनेक धनिक, सेवाभावी व्यक्ती, संघटना, पंथ, पक्ष, सांप्रदाय, धार्मिक आणि सामाजिक संस्था पुढे येऊन निरपेक्ष बुद्धीने एक समाज ऋण म्हणून कार्य करताना दिसत आहेत.
ही मदत, ही सेवा, हे जगविणे आणि कठीण परिस्थितीत सामाजिक ऐक्य अबाधित राखणे यासारखे कार्य घडतेय, घडत राहणारही आहेच.
त्याचे कारण एकच आहे, ते म्हणजे तुमच्या आमच्या मनातील काही झालं तरी मी एक माणूस आहे आणि “माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे’ हाच रोकडा धर्म आहे, ही भावना. हेच खरं परस्परातलं निरपेक्ष प्रेम आहे.
हे आमच्या संस्कृतीने आपल्याला पाजलेले बाळकडूू आपल्या सर्वांच्या नसानसात भिनलेले आहे. ह्या सामाजिक प्रेमाला, ऐक्याला जगात तोड नाही हेच खरं.
माणूस हा समाजप्रिय आहे. समाजातच माणसावर संस्कार घडतात. “माणूस’ म्हणून समाजच मान्यता देतो. समाजात फक्त माणूसच गणला जातो असे नाही तर, पाळीव प्राणी, पक्षी हेसुद्धा समाजाचेच एक घटक आहेत.