सातारा – सातारा शहरात सुरू असलेली भुयारी गटार योजना पांढरा हत्ती ठरली आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांना साताऱ्याच्या विकासाचे घेणे- देणे नाही. त्यामुळे ही योजना केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी आहे, असा घणाघाती आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवजयंती महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना शिवेंद्रसिंहराजे यांनी चौफेर टोलेबाजी केली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “”सातारा शहरात सध्या धुळीचे साम्राज्य आहे. साताऱ्यात सुरू असलेली भुयारी गटार योजना प्रशासकीयदृष्टया पांढरा हत्ती ठरली आहे.
बोगदा ते बुधवार पेठ यादरम्यान या योजनेचे केवळ 20 टक्के काम झाले आहे. अजून दोन टप्प्यांमध्ये ही योजना संपूर्ण सातारा शहरात लागू करावयाची आहे. मोती चौक ते राधिका चौक यादरम्यानच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर सध्या धुळीचे साम्राज्य आहे. खडी टाकून सपाट करण्यात आलेला रस्ता ठेकेदाराने पुन्हा उचकटला असून त्यामुळे बुधवार पेठ, प्रतापगंज पेठ, बोगदा, राजवाडा परिसरात फक्त धुळीचे साम्राज्य असून याचा सातारकरांना त्रास होत असल्याची ठेकेदारासह सत्ताधाऱ्यांनाही जराही खंत नाही, असा आरोप त्यांनी केला. प्रशासक या नात्याने अभिजित बापट यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. ठेकेदार हा निर्ढावलेला असून त्याला सातारकरांच्या आरोग्याशी कोणतेच देणे घेणे नाही.
संबंधित आघाडीचे माजी नगरसेवक, त्यांचे ठेकेदार आणि त्यांची टक्केवारी यातच सध्या ते मश्गुल आहेत. भुयारी गटार योजनेसाठी एकाच ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र उभे करावयाचे होते. मात्र, सत्ताधाऱ्यांना ती जागा मिळून शकल्याने आता प्रत्येक विभागांमध्ये एक एक एसटीपी उभारला जाणार आहे. मात्र, प्रत्यक्षात ते जागेअभावी उभारणे अशक्य आहे. त्यामुळे ही योजना केवळ पांढरा हत्ती असून ही योजना पुढे कशी राबवणार त्यामध्ये सातत्य राहणार का, असे बरेच प्रश्न शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केले.