मुंबई – प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीभोवती असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यास आज पहाटे पासून सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आला. तसेच प्रतापगडाच्या पायथ्याला कलम १४४ लागू करून कोणालाही त्या ठिकाणी जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. याववरुन आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी याबाबत भाष्य केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अफझल खानाच्या कबरीबाबत वाद सुरु होता. कबरीभोवती असलेले अनधिकृत बांधकाम हटवायला आज सुरुवात करण्यात आली. प्रशासनाच्या या निर्णयाचे अमोल मिटकरींनी स्वागत केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. अफझल खान हा स्वराज्याचा शत्रू होता. अफझल खानाचा वध ही इतिहासातील महत्वाची घटना होती असं मिटकरी यावेळी म्हणाले. तसेच खानाची कबर उध्वस्त करण्याची मागणीही काही लोक करत होते परंतु,कबर उध्वस्त केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षाही उध्वस्त होऊ शकते असं स्पष्ट मत अमोल मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केलं.
या कबरनजिक असलेले अतिक्रम पाडण्यासाठी बुधवारी रात्रीच तयारी सुरु करण्यात आली होती. शिवप्रताप दिनी अनेक शिवभक्त यावेळी महाबळेश्वर परिसरात जमा झाले होते. परंतु १४४ लागू असल्यामुळे कोणालाही किल्ल्याच्या पायथ्यशी जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. १५०० हुन अधिक पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याचे समजते. तसेच सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अनधिकृत गोष्टी हटवण्यास सुरुवात झाल्याचे समजते.
महाबळेश्वर,वाई,कराड,सातारा तसेच प्रतापगड परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी माध्यम प्रतिनिधींना देखील याठिकाणी जाण्यास परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. गेल्या काही वर्षांमध्ये अफझल खानाच्या कबरीशेजारी बांधकाम करून उत्तातिकरण करण्याच्या प्रकाराला सुरुवात झाली होती. न्यायालयाने देखील हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केल्याचे दिसून आले.