मुंबई – पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत होते. अखेर संजय राऊत यांना आज जामीन मंजूर होऊन ते बाहेर आले. संजय राऊत यांच्यासह त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राऊतांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे राऊत यांना दिलासा मिळाला असताना दुसरीकडे राऊत यांच्या जामिनाला ईडीचा विरोध कायम आहे.
अशातच बुधवारी रात्री न्यायालयीन कोठडीतून सुटका होताच त्यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. त्यांच्या जामीनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट भाष्य करणं टाळलं आहे. राऊतांच्या जामिनाबाबत प्रवक्ते बोलतील, असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना विशेष न्यायालयाने ईडीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. राऊत यांना झालेली अटक अवैध आहे. ती कारवाई म्हणजे छळवणुकीचा प्रकार आहे, असे न्यायालयाने म्हटले.
ईडीने संबंधित प्रकरणातील इतर आरोपी असणाऱ्या प्रविण राऊत यांना केवळ दिवाणी स्वरूपाच्या वादावरून अटक केली. तर, संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक करण्यात आली. म्हाडा किंवा 672 कुटूंबांची फसवणूक करण्याचा संजय आणि प्रविण राऊत यांचा हेतू असल्याचे कशावरूनच आढळून येत नाही.