मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा होता. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना या निकालाचा मोठा धक्का बसल्याच दिसून आलं आहे.
दरम्यान, आता शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ‘शिवगर्जना शिवसंकल्प सभा’ उद्धव ठाकरे घेत आहे. 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड भागात पहिली सभा पार पडली होती. त्यानंतर त्यांनी राज्यातील अनेक भागांमध्ये सभा घेतल्याचं दिसून आलं. आता प्रथमच उद्धव ठाकरे जळगाव दौऱ्यावर येत असून, पाचोरा येथे रविवारी सायंकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे.
ती सभा भव्यदिव्य करण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. पक्षात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील चार आमदार शिंदे गटात गेले. कधीकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हे सातत्याने ठाकरे गटावर टिकेची झोड उठवित आहेत. आमदार शिंदे गटात गेले असले तरी सर्वसामान्य शिवसैनिक ठाकरे गटाकडेच असल्याचे सिद्ध करण्यासाठी सभा यशस्वी करण्यासाठी जोर लावण्यात येत आहे.
यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावत सभेआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं दिसून येत आहेत. मात्र, आता जळगाव पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स हटवले आहेत. या बॅनरबाजीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधीच पोलिसांनी कारवाई करत हे बॅनर्स हटवले आहेत. जळगावच्या पाचोरामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सभेआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होत, मात्र आता ते देखील पोलिसांनी बंद पडल्याचं दिसत आहेत.