नवी दिल्ली – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात बोलले की सीबीआय, ईडी अथवा आयटी मागे लागतात असे सर्वसाधारण वातावरण आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्याशी संबंधित खळबळजनक दावा केला होता.
त्यानंतर त्यांना सीबीआयने नोटीस पाठवली व चौकशीसाठी बोलावले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच थेट प्रश्न विचारण्यात आला. केंद्र सरकारवर टीका केली सीबीआयचे असे बोलावणे का येते अशी विचारणा त्यांना केली. मात्र टीका केल्यामुळे असे काही होत असल्याचा शहा यांनी इन्कार केला आहे.
शहा म्हणाले की त्यांच्या माहितीनुसार मलिक यांना तिसऱ्यांदा बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडे काही पुरावे अथवा विशेष माहिती असावी म्हणून ते जाणून घेण्यासाठी त्यांना बोलावले गेले असावे. आमच्या विरोधात बोलल्यामुळे हे झाले असे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे.
शहा पुढे म्हणाले की मलिक इतके दिवस आमच्यासोबत होते तेव्हा ते काहीच का बोलले नाहीत आणि ते स्वत: सत्तेत असताना त्यांचा आत्मा का जागा झाला नाही. राज्यपाल पदावर ते होते. त्यावेळी ते गप्प का राहीले? भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अशी कोणतीही गोष्ट केलेली नाही की ज्याची आम्हाला लपवाछपवी करावी लागेल.