मुंबई : शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यावरही टीका केली. त्यांच्याविषयी बोलताना ‘आपल्या पलिकडच्या ताईंना धमक्या मिळाल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली’, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान,याच आरोपांना भावना गवळी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंच्या आरोपावर बोलताना,“मी यापूर्वीही माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी पंतप्रधान मोदींना आज नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून राखी बांधते आहे. त्यामुळे यावरून कोणीही राजकारण करू नये. हे मी यापूर्वीही सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही मी दरवर्षी राखी पाठवते”, अशी प्रतिक्रिया खासदार भावना गवळी यांनी दिली आहे.
“माझ्यावर जे आरोप करण्यात आले होते, त्या प्रकरणी मला न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. संजय राऊतांनाही न्यायालयानेच दिलासा दिला आहे. त्यामुळे कोणीही न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढू नये”, असे प्रत्युत्तरही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले.
दरम्यान, बुलढाण्यात आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी “आपल्या पलिकडच्या ताई तुम्हाला माहिती आहेत. शिवसेनेने त्यांना अनेकदा खासदार केलं. मात्र, या ताईंना धमक्या देण्यात आल्या. मुंबईहून इकडे दलाल पाठवण्यात आले. त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक झाली, पण ताई मोठ्या हुशार निघाल्या. ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. तो राखी बांधल्याचा फोटो छापून आणला आणि मग तो फोटो छापून आल्यावर ताईंवर कारवाई करण्याची ईडी-सीबीआयवाल्यांमध्ये हिंमत आहे का? त्या तिकडे गेल्यावर त्यांना सर्व आरोपांपासून संरक्षण मिळालं”, असे ते म्हणाले होते.