उदयनराजेंची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; वादग्रस्त पुस्तकाचा निषेध
पक्षाचे नाव बदलून “ठाकरे सेना’ करण्याचे शिवसेनेला आव्हान
पुणे – “जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची उंची कुणीही गाठू शकणार नाही. मात्र, सध्याच्या काळात “जाणता राजा’ उपमा कुणालाही दिली जाते. मात्र, या जगात छत्रपती शिवाजी महाराजच खरे जाणते राजे आहेत,’ असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. याचबरोबर, पंतप्रधान मोदी यांची तुलना करणारे “आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्याने वाईट वाटत असून या पुस्तकाचा निषेध करत असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. शिवसेना पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पक्षाला देताना महाराजांच्या वंशजांना विचारणा केली होती का, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने पक्षाचे नाव बदलून ठाकरे सेना करावे, असे आव्हानही उदयनराजे यांनी दिले.
“आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या भाजपच्या एका नेत्याने प्रकाशित केलेल्या वादग्रस्त पुस्तकावर उदयनराजे यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषदेत सडेतोड भूमिका मांडली. यावेळी, उदयनराजे यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार टीकास्त्र सोडले. संपूर्ण देश छत्रपतींच्या विचारांना आदर्शस्थानी ठेवून काम करत असल्याने त्यांची तुलना कोणाशीही होणार नाही. मात्र, गोयल नावाच्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. वास्तविक प्रत्येक जण महाराजांचे चरित्र वाचून त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो.
पण, छत्रपती शिवाजी महाराज कुणीही बनू शकणार नाही. युगपुरुष फक्त एकदाच जन्माला येत असून छत्रपती शिवाजी महाराज हेच युगपुरुष असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. “आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी यावर बोलावे, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, “ज्यांची लायकी नाही, त्या बिनपट्टयाची माणसे सध्या बोलत आहेत. यापुढे कुणीही काहीही बोलायचे आणि आम्ही ऐकून घ्यायचे हे चालणार नाही. कुठलाही पक्ष असू दे, त्यांनी महाराजांबद्दल बोलताना विचार करून बोला, अन्यथा गाठ माझ्याशी आहे,’ अशा शब्दात उदयनराजे यांनी सर्व पक्षांना खडेबोल सुनावले.
उदयनराजेंनी शिवसेना भवनाचे काही फोटो दाखवले. या फोटोत शिवसेना भवनाच्या इमारतीवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वरच्या बाजूस तर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो खालील बाजूस असल्याचे दाखविले. या फोटोत बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेखाली महाराजांची प्रतिमा का ठेवली, असा थेट प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम म्हणजे दिखाऊपणा असल्याची टीका शिवसेनेवर केली. मी छत्रपतींच्या घराण्यात जन्माला आलो तरी संपूर्ण देश महाराजांच्या विचारांचा वारसदार आहे. मी फक्त छत्रपतींच्या घराण्याचा वंशज आहे. मात्र, या देशातील जनताच खरी वारसदार असल्याने माझे काय चुकल्यास ते सांगण्याची जबाबदारी लोकांची असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
राजेशाही असती तर…
देश लोकशाही मार्गाने चालत असल्याने आम्ही शांततेने भूमिका मांडतो आहे. या देशात प्रत्येकाने लोकशाहीचा आदर केला पाहिजे. मात्र, महाराजांची तुलना मोदींशी करणाऱ्या लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का, असा प्रश्न उपस्थित करुन सध्याच्या काळात लोकशाही आहे, जर राजेशाही असती तर गोयलची पळताभुई थोडी केली असती, असेही राजेंनी ठणकावले.
“शिव’ शब्द का काढला?
प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सोर्यीप्रमाणे घेत आहे. मात्र, शिवस्मारक, आरक्षणासारखे प्रश्न “जाणता राजा’ म्हणवणाऱ्यांनी प्रलंबित का ठेवले, असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला. तसेच स्वार्थासाठी एकत्र आलेली आघाडी जास्त काळ एकसंध राहणार नसल्याचे सांगत महाशिवआघाडीतून “शिव’ शब्द का काढला, असाही प्रश्न त्यांनी केला.
शिवजयंती एकदाच साजरी करा
देशभरातील इतिहासकारांनी संशोधन केल्यानंतर 19 फेब्रुवारी ही तारीख शिवजयंतीसाठी निश्चित केली. मात्र, तरीदेखील तीन-तीन वेळा शिवजयंती साजरी केली जाते. महाराजांचा अजून किती अपमान करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराजांची जयंती जगभरात एकदाच साजरी केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.