सातारा (प्रतिनिधी)- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. कॉंग्रेसने यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा केवळ वापर केला. त्यांचे विचार अंगिकारले नाहीत. पुढे येऊ पाहणाऱ्या माणसांना गायब करण्याचे काम काँग्रेसने केले, असा आरोप उदयनराजे यांनी केला.
उदयनराजे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या मातीत अनेक चळवळी उदयास आल्या, त्यामध्ये स्त्री शिक्षण, सत्यशोधक समाज, प्रतिसरकार यांचे मोठे योगदान देशाच्या उभारणीच झाले. कै. यशवंतराव चव्हाण यांनी देखील देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले.
परकीय आक्रमणाच्या काळात त्यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपद भूषवले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे त्यामुळेच म्हटले जाते. यशवंत विचार लोककल्याणाचा विचार आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला. पण त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत. एवढे मोठे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेले तरी देखील काँग्रेसला भारतरत्न पुरस्कार देण्याचे सुचले नाही.
काँग्रेसला ‘आऊट ऑफ साईट, आऊट ऑफ माईंड’ हे सूत्र लागू होतं. यशवंतराव यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे कर्तव्य आम्ही पार पडणार आहोत. काही लोकांनी स्वार्थापुरता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला, त्यांनाही यशवंतराव यांना भारतरत्न द्यावा असे वाटले नाही. यशवंतरावांनंतर त्यांच्या विचारांना कॉंग्रेसने तिलांजली दिली.
पुढे येणाऱ्या अनेक नेतृत्वांना गायब करण्याचे प्रकार काँग्रेसमध्ये घडले, असा गंभीर आरोप उदयनराजे यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत २९ एप्रिलला जाहीर सभा होणार आहे. या सभेतच यशवंतराव यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणार आहे, असे उदयनराजे यांनी सांगितले.