जलमंदिर व सुरुचीवर तयारी सुरू
घड्याळाची टिकटिक ठरणार डोकेदुखी
सातारा – भाजपच्या कमळ चिन्हावर पुन्हा राजकीय भवितव्य आजमावणारे उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विधानसभेच्या आखाड्यासाठी सज्ज झाले आहेत. पितृपंधरवडा संपल्यानंतर दोन्ही राजे एकाच दिवशी, एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे नियोजन जलमंदिर व सुरूची बंगल्यावर सुरू झाले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी जिकिराचा मामला आहे. उदयनराजे हे 11 दिवसांपूर्वी खासदारकीचा राजीनामा देऊ न भाजपवासी झाले तर शिवेंद्रसिंहराजे यांनी दोन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. या दोन्ही राजांमुळे साताऱ्यात कमळ फुलणार, असे मानले जात असले तरी राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक दोन्ही नेत्यांना स्वस्थ बसू देणार नाही. उदयनराजे यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 1 लाख 29 हजार मताधिक्य मिळाले. मात्र, शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी तगडी टक्कर दिल्याने 2014 च्या तुलनेत उदयनराजेंचे मताधिक्क तब्बल अडीच लाखांनी घटले.
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवेंद्रराजे यांना 47 हजार मताधिक्य मिळाले होते. मात्र, सातारा शहरात मिळणाऱ्या मताधिक्यात घट झाली होती. या मतांची बांधणी विकासकामांच्या मुद्द्यावर पुन्हा कशी होईल, हे पहावे लागेल. सातारा शहराची हद्दवाढ, वैद्यकीय महाविद्यालय, ग्रेड सेपरेटर, पन्नास कोटीचे कॉंक्रिट रस्ते, बोंडारवाडी धरणास प्रशासकीय मान्यता, या प्रकल्पांची जंत्री घेऊन नवमतदारांना साकडे घालावे लागणार आहे. दोन्ही राजांच्या जाहीरनाम्यांची उत्सुकता नक्कीच आहे.
पितृ पंधरवड्यानंतर खरी लगबग
दोन्ही राजे एकाच वेळी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी फॉर्म भरतील. त्याची जय्यत तयारी करण्याचा चंग समर्थकांनी बांधला आहे. सध्या जलमंदिरात गाठीभेटींचे सत्र सुरू आहे. जाहीरनामे, फ्लेक्स व अन्य कामांची जवाबदारी निश्चित करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. भाजपच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या सदस्यांनी बुधवारी उदयनराजेंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. शिवेंद्रराजे यांनी तालुक्यातील दोनशे गावांपैकी मोठ्या गावांमध्ये संपर्क अभियान सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात कुडाळ, शेंद्रे व नागठाणे या गटांवर शिवेंद्रराजे यांचे बारकाईने लक्ष आहे.
कार्यकर्त्यांच्या मनोमीलनाचे त्रांगडे
दोन्ही राजांचे पुन्हा एकदा मनोमीलन झाले असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन अद्याप दूर आहे. दोन्ही राजे एकाच वेळी अर्ज भरणार असे सांगत असले तरी दोघांच्या समर्थकांनी स्वतंत्रपणे तयारी सुरू केली आहे. दोन्ही राजे भाजपमध्ये एकत्र आले असले तरी साताऱ्यात पक्षाचे दोन स्वतंत्र गट तयार झाले आहेत. या सगळ्या गदारोळात भाजपचे मूळचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या घडामोडींपासून दूर आहेत; प्रत्यक्ष निवडणुकीत सगळे एकजिनसी दिसतील, असे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत. प्रचाराची रणनीती ठरवताना भाजपच्या निष्ठावंतांना विश्वासात घेतले जाणार का, हा कळीचा मुद्दा आहे.