सातारा – आधीच दर्जाहीन काम झालेल्या आणि गत महिन्यात सलग 15 दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने महामार्गासह सेवा रस्त्याची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. महामार्गावर आणि सेवरस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे गेल्या काही दिवसात अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. एकंदरीतच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांसह प्रवाशांचा महामार्गावरील प्रवास जीवघेणा झाला आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाने मात्र तात्पुरती मलमपट्टी करुन रस्त्याच्या दुरवस्थेकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये महामार्गाचे रुंदीकरण झाले. एकेरी असणारा रस्ता आधी चार पदरी आणि आता सहापदरी झाला. मात्र रस्त्याच्या या कामात संबंधीत ठेकेदाराने टक्केवारीच्या नादात केलेली तडजोड आता वाहनधारकांसह सर्वसामान्य प्रवाशांच्या जिवावावर बेतत आहे. सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर सध्या जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, तसेच स्थानिक वाहनधारकांसाठी तयार करण्यात आलेले सेवा रस्ते सेवारस्ते नाही तर नुसतेच अडथळे झाले आहेत. विशेषत: सातारा ते पाचवड दरम्यानच्या सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी या सेवा रस्त्याची कामे अद्याप अपूर्णच आहेत. पाचवड ते आनेवाडी पर्यंतचा सेवा रस्ता खड्ड्यामुळे अनेक ठिकाणी खचला आहे.
तर उडतारे येथे सेवा रस्त्याच्या मधोमध महावितरणचे असणारे खांब अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे या सेवा रस्त्याचा वापर होतच नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. आनेवाडीपासून पुढे आल्यावर रायगावच्या हद्दीत महामार्ग ओलांडण्यासाठी बांधण्यात आलेला भुयारी मार्ग हा सुरुवातीपासूनच पावसाळ्यात किमान दीड ते दोन महिने पाणी साठल्याने वाहतुकीसाठी बंद राहत आहे, विशेष म्हणजे याठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साठते की हा भुयारी मार्ग नव्हे तर एखादे नदीपात्र असल्याचा भास होतो.
सध्याच्या पावसाळ्यातही याठिकाणी रात्रीच्या वेळी प्रवास करणारे दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनधारकही या भुयारी मार्गावरील साठलेल्या पाण्यात चांगलेच अडकले, शेवटी क्रेन अथवा जेसीबीच्या साहाय्याने ही वाहने बाहेर काढावी लागली. रायगवपासून पुढे साताऱ्यापर्यंत सेवा रस्ता आणि महामार्गात तसा फारसा फरकच राहिला नाही. महामार्ग आणि सेवा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत तर अनेक ठिकाणी डांबर उखडल्याने रस्त्याने वाहन चालवताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
मुळातच रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने घाईगडबडीत उरकल्याने रस्त्याला कसलाच दर्जा राहिला नाही, अनेक ठिकाणी रस्ता खचण्याचे प्रकार घडले आहेत, उड्डाण पुलावर खड्डे पडले असून अवजड वाहनांच्या दणक्याने पुलाखाली सिमेंट ढासळत आहे, रस्त्याची चाळण झाली आहे, एकंदरीतच रस्त्याची सध्याची अवस्था बघता याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून प्रशासनाला मात्र या साऱ्याशी काहीही देणंघेणं राहिलेलं नाही.