संभाषण तुटणे, नेटवर्क नसणे असे प्रकार वाढले
पुणे – दूरसंचार क्षेत्रातील सर्वच कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे चित्र असून त्यामुळे ग्राहकांना वारंवार कॉलड्रॉपच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. संभाषणात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे मोबाइल ग्राहकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
भ्रमणध्वनीवर बोलताना अचानक संभाषण तुटणे, नेटवर्क नसणे असे प्रकार वाढत असून सर्वसामान्यांना पैसे मोजूनही संपर्क साधताना मर्यादा येत आहेत. याचा परिणाम मोबाइल सेवेवर होत आहे. काही भागांत तर तास्नतास नेटवर्कच मिळत नाही. अनेक कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यानंतरही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र, काही दिवसांपासून या समस्येमध्ये वाढ होत आहे.रेडिएशनच्या दुष्पपरिणामांमुळे बऱ्याच गृहनिर्माण संस्था मोबाइल टॉवरकरिता जागा देण्यास तयार नाहीत. याचा फटका मोबाइल कंपन्यांना बसत आहे.
अनेक ठिकाणचे टॉवर बंद पडू लागले असून पुण्यात टॉवरसाठी जागा मिळविताना झगडावे लागत आहे. काही कंपन्यांचे टॉवर कमी झाल्याने त्यांच्या ग्राहकांना अचानक नेटवर्क गेल्याने कॉल ड्रॉप होणे, काही भागांत नेटवर्कच नसणे, डाटा वापरताना नेटवर्कचा वेग कमी होणे, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कंपन्यांचे ग्राहक आणि त्यांना सामावून घेणारे नेटवर्क टॉवर यांची संख्या पुरेशी नाही. त्यात काही टॉवर दुरूस्तीकरिता अधूनमधून बंद ठेवावे लागतात. त्यामुळे नेटवर्कची समस्या अधिकच गंभीर होते. एका टॉवरच्या सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात एका वेळेस 200 ते 250 कॉलवर एकाच वेळी बोलता येते. त्यामुळे एखादा टॉवर जरी बंद पडला तरी त्याचे परिणाम कॉल ड्रॉप, नेटवर्कमध्ये अडचणी येण्यात होतो.