सातारा – सोन्याचे दागिने तयार करुन देण्यासाठी शहरातील सराफाकडून घेतलेले 15 लाख रुपये किंमतीचे अर्धा किलो सोने घेऊन बिहारमधील दोन कामगारांनी पोबारा केल्याची घटना आज शुक्रवारी घडली. यामुळे सराफी बाजारात एकच खळबळ माजली असून याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमेश रमेश घोडके (रा. कोटेश्वर मैदानानजिक, सातारा) यांचे येथील शनिवार पेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. गेल्या वर्षी निसार शेख खान व प्रभुदेवा नावाचे दोन कामगार त्यांच्या संपर्कात आले. सोन्याचे दागिने बनवून घेण्याचे काम घोडके त्यांच्याकडून करुन घेत होते. वर्षभरात या जोडगोळीने घोडके यांच्या सराफबाजारातील इतर काही व्यापाऱ्यांचा चांगलाच विश्वास संपादन केला होता. मात्र, शुक्रवारी या परप्रांतिय कामगारांनी व्यापाऱ्यांच्या विश्वासाला तडा दिला.
घोडके शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुकानात आले. त्यांनी निसार खान व प्रभुदेवा यांच्याकडे अर्धा किलो सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते. घरी सिलेंडर गॅस आणण्याचा बहाणा करत घोडके यांना खोलीवर जातो, असे सांगून निसार शेख दुपारच्या सुमारास निघून गेला. प्रभुदेवा हादेखील काही वेळाने पोटात दुखत असल्याचे सांगत खोलीवर जातो, असे सांगून निघून गेला. सायंकाळपर्यंत हे दोघेही परत न आल्याने घोडके हे त्यांच्या खोलीवर गेले असता खोलीला कुलूप होते. त्यांच्याबाबत चौकशी केली असता ते कोठेही आढळून आले नाहीत. घोडके यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते स्वीचऑफ लागल्याने मग त्यांचे धाबे दणाणले.
सायंकाळी घोडके यांनी थेट शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत निसार शेख खान व प्रभुदेवा यांच्याविरुध्द ते 15 लाख रुपयांचे अर्धा किलो सोने घेवून पळून गेले असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोन्ही परप्रांतिय कामगारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून ते दोघे बिहारमधील रहिवासी आहेत. या गुन्हयाचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार हसन तडवी करत आहेत.