पुणे – सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रिडींग घेण्यासाठी किमान 1 ते 4 तास लागतात. जीपीएस रिंडींग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने “सर्वे ऑफ इंडिया’च्या मदतीने कॉर्स (कन्यटिनिव्ह ऑपरेशन रिडींग स्टेशन) या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. कॉर्स आधारे जीपीएस रिडींग फक्त 30 सेंकदात घेता येणार आहे. याचा उपयोग राज्य शासनाबरोबरच सर्वे ऑफ इंडियाला देशाचा नकाशा तयार करण्यासाठी होणार आहे.
जमीन मोजणीसाठी निरनिराळ्या साधनांचा वापर केला जातो. जीपीएस मशीनच्या साहाय्याने मोजणी करणे हा पण एक पर्याय उपलब्ध आहे. संबंधित जागेवर जीपीएस रिंडींग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांक्ष व रेखांश घेतले जाते. या अक्षांक्ष व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, जीपीएस रिंडींग घेण्यासाठी वेळ लागतो.
जमिनीच्या क्षेत्राचे अक्षांक्ष व रेखांश घेण्यासाठी कॉर्स हे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी संपूर्ण राज्यात कोर्स स्टेशनचे जाळे उभारले जाणार आहे व याद्वारे 77 ठिकाणी हे स्टेशन कार्यान्वित केले जाणार आहे. यासाठी सर्वे ऑफ इंडिया यांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात याची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केवळ इंटरनेटची आवश्यकता आहे. इंटरनेट उपलब्ध असेल तर, अचूक रिंडींग फक्त अर्धा मिनिटात मिळणार आहे. याची चाचणी नुकतीच जिल्ह्यात घेण्यात आली.
या तंत्रज्ञानामुळे जमीन मोजणीत पारदर्शकता आणि गतिमानता येणार आहे. हे तंत्रज्ञान मौलाचा दगड ठरणार आहे. सर्वे ऑफ इंडिया सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक 70 ते 80 किलोमीटर अंतरावर जीपीएस स्टेशन स्थापन करणार आहे.