मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवारांच्या बंडखोरीमुळे पक्षातउभी फूट पडली आणि दोन गट निर्माण झाले. अजित पवार गट भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. तसेच अजित पवारांच्या गटातील इतर आठ आमदारांनीही खातेवाटप करण्यात आले. त्यानंतर आता कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनीदेखील अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. तयानंतर त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली तेव्हा कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे कुटुंबाबरोबर परदेशात गेले होते. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. यावेळी आशुतोष काळे म्हणाले, “त्यांना अजित पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा तिकीट दिले जाणार आहे” त्याचबरोबर ‘हे घडलं (पक्षात दोन गट पडले) तेव्हा मी परदेशात होतो. मी परतल्यानंतर अजित पवार, शरद पवार तसेच इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार म्हणून काम करतो. त्यामुळे या सगळ्या घडामोडी घडल्या तेव्हा सगळेच जण द्विधा मनःस्थितीत होते. एका बाजूला शरद पवार आहेत, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार आहेत.” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान आमदार काळे म्हणाले, “कुठल्याही परिस्थितीत आपले विचार आपण सोडायचे नाहीत, असं शरद पवार म्हणाले आहेत. परंतु आम्ही सत्तेत असताना आम्हाला जेवढी कामं करता आली तेवढी कामं विरोधी पक्षात असल्यावर मार्गी लागत नव्हती. कोपरगावातील मतदारांनी जी संधी दिली आहेत, त्यानंतर आता त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्यांची जास्तीत जास्त कामं मार्गी लावण्यासाठी मी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांचीही भेट झाली.”
आमदार आशुतोष काळे म्हणाले, “आपण जरी आत्ता विचार करतोय की पक्षात दोन गट पडले आहेत. एक अजित पवारांचा गट, एक शरद पवारांचा गट. परंतु भविष्यात आम्ही एकसंघ पद्धतीने आणि एका विचाराने एकत्र काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी छोटा कार्यकर्ता असलो तरी त्यात माझी मदत करता आली तर मी ती करेन.” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.