सातारा – संरक्षित वन्यप्राणी सांबराच्या शिंगांची विक्री व तस्करी करणार्या नितीन आत्माराम जाधव (वय 32) आणि अमोल सुरेश गायकवाड (वय 38, रा. गोसावीवाडी, ता. कराड) यांना स्थानिक गुन्हे शाखेने काल (दि. 20) पेरले, ता. कराड येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून सांबराची शिंगे आणि दुचाकी मिळून पाच लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या अवयवांची विक्री व तस्करी होत असल्याने, स्थानिक गुन्हे शाखेने माहिती मिळवण्यास सुरुवात केली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पेरले, ता. कराड गावच्या हद्दीत दोन जण शनिवारी (दि. 20) वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीसाठी येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी वेषांतर करून, तेथे सापळा लावला. तेथे दोन युवक संशयास्पदरित्या वावरताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पोत्याची पाहणी केली असता, त्यामध्ये सांबराची दोन मोठी शिंगे सापडली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन, शिंगे आणि दुचाकी जप्त केली.
या दोघांवर वन्यप्राणी अधिनियम 1972 अन्वये उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, हवालदार साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, लक्ष्मण जगधने, मुनीर मुल्ला, अमोल माने, अमित झेंडे, केतन शिंदे, स्वप्निल दौंड यांनी ही कारवाई केली.