भोर उपविभागात पहिला दस्त नोंदणी ः उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार
भोर – सलोखा’ योजनेतून पडिक शेतजमिनींना बूस्टर मिळणार असून, आपापसातील वादावर कायमचा पडदा पडणार आहे. सलोखा योजने अंतर्गत भोर उपविभागार्तगतील दुय्यम निबंधक कार्यालयात पहिला दस्त नोंदणी करण्यात आला.
विठ्ठल मारूती खोपडे (सांगवी खुर्द निधान) व सुरेश भाऊसो झेंडे (रा.सांगवी खुर्द निधान) या शेतकऱ्यांचा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या हस्ते सत्कार करून नोंदणीकृत दस्त सुपुर्त करण्यात आले.
याप्रसंगी दुय्यम निबंधक शेखर कुलकर्णी, निवासी नायब तहसीलदार अरूण कदम, अँड. कल्पना म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते विक्रम चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतजमीन मालकी हक्काचे वाद कमी करण्यासाठी सलोखा योजना सुरू केली आहे. त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. भोर उपविभागात पहिला सलोखा दस्त नोंदणी झाली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी एकाच्या नावावर आणि जमिनीची वहिवाट दुसऱ्याची अशी परिस्थिती आहे.
त्यासाठी १२ वर्षांपासून असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची अदलाबदल नाममात्र १ हजार रुपयात नोंदणी करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने सलोखा योजना सुरू केली आहे. या योजनेतून अल्पभूधारक, वहिवाटीवरून होणाऱ्या वादावर आता कायमचा तोडगा निघत आहे. त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.