सातारा – शशिकांत शिंदे यांनी २५ वर्षांहून अधिक काळ सामान्य जनतेसाठी झोकून देऊन काम केले आहे. आपला नेता आणि पक्षाशी कायम निष्ठा ठेवणाऱ्या शशिकांत शिंदे यांची सामान्य जनतेवरही निष्ठा कायम राहिली. सामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सोडवण्यात शशिकांत शिंदे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ही निवडणूक आता जनतेने हाती घेतली असल्याने मतदार शशिकांत शिंदे यांना साथ देऊन मोठ्या मताधिक्क्याने विजयी करतील, असा विश्वास सौ. वैशाली शिंदे यांनी व्यक्त केला.
सातारा लाेकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ महिला आघाडीच्यावतीने सातारा शहरात ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी सौ. शिंदे बोलत होत्या. यावेळी सौ. समिंद्रा जाधव, तेजस्वी केसरकर, सुषमा राजेघोरपडे, प्रज्ञा गायकवाड, वैशाली जाधव, अंजली राजपूत, शैलजा कदम, सुनंदा शिवदास, नलिनी जाधव, डॉ. सुनीता शिंदे, संगीता ढाणे आदी उपस्थित होत्या. सौ. वैशाली शिंदे म्हणाल्या, देशाचे नेते शरद पवार यांनी केलेला संघर्ष सर्वांनी पाहिला आहे. वयाच्या ८४ व्या वर्षीही हा योद्धा अतिशय ताकदीने पक्षाची मोट बांधत आहे. या संकटाच्या काळात राज्यातील जनता पवार यांच्याबरोबर असल्याचे दिसत आहे. विशेषत: युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा शरद पवार यांना पाठिंबा वाढत आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवले आहे. तळागाळातील लाेकांशी त्यांची नाळ जोडली असल्याने मतदारसंघात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा विश्वास सौ. शिंदे यांनी व्यक्त केला.
सौ. समिंद्रा जाधव म्हणाल्या, आ. शशिकांत शिंदे यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असून त्यांना लाेकसभेत पाठवण्यासाठी महिला आघाडीने प्रचार मोहीम गतीने राबवण्यास सुरुवात केली आहे. काही लाेकांनी स्वार्थासाठी पक्ष, घरे फोडली. अशा संकटाच्या काळात पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय ठिकठिकाणी घेतला जात आहे. सातारा लाेकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने जनतेत नाराजी आहे. आ. शशिकांत शिंदे युवकांसाठी रोजगार व महिलांसाठी उद्योगधंदे निर्माण करु शकतील अशी अपेक्षा असल्यामुळे आ. शिंदे यांना मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहन सौ. जाधव यांनी केले. यावेळी तेजस्वी केसरकर, सुषमा राजेघोरपडे, प्रज्ञा गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली – सौ. शिंदे
आ. शशिकांत शिंदे हे संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. जिल्ह्याने त्यांचा संघर्ष पाहिला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात त्यांची वेगळी प्रतिमा आहे. विकासकामांवरुन आ. शिंदे यांच्यावर टीका करता येत नसल्याने काही लाेकांकडून तथ्यहिन आणि बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने आणि शिंदे यांच्यावर बोलण्यासाठी कोणता ठोस मुद्दा नसल्याने विरोधकांकडून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, से सौ. वैशाली शिंदे यांनी सांगितले. मतदारसंघातील जनता सूज्ञ असून शशिकांत शिंदे काय व्यक्तिमत्व आहे हे त्यांना माहित आहे. त्यामुळे असल्या फसव्या आरोपांना ही जनता भुलणार नाही, असा विश्वास सौ. वैशाली शिंदे यांनी व्यक्त केला.