नगर – ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून मागील वर्षी प्रमाणेच यंदाही पंचवीस टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे. पहिल्याच हप्त्यातून ही रक्कमेची कपात करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीयोजना, पथदिवे वीजबिलाची थकबाकी आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 25 टक्के रक्कम कापली जात आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील 1311 ग्रामपंचायतींची सुमारे 22 कोटी 50 लाखाची रक्कम कपात करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील 1312 ग्रामपंचायतीच्या निधीतून 29 कोटी 74 लाख 70 हजार रुपयांची कपात करण्यात आलेली आहे.
वीजबिलाची थकबाकी पोटी जिल्ह्यातील पाणी योजना व पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केलेला आहे. त्यामुळे ही रक्कम नेमकी कशासाठी कपात केली जाते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. मागील वर्षी 25 टक्के कपात करण्यात आल्यावर जिल्हा परिषदेचे सदस्य चांगलेच संतप्त झाले होते. पुन्हा यंदाच्या वर्षी 14 व्या वित्त आयोगाच्या निधीचा पहिला टप्प्प्यात 89 कोटी 24 लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे. त्यातून 25 टक्के कपात करण्यात आलेली आहे.