पंढरपूर – आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला… पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर…आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय असं साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशीच्या महापूजेनिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर उजळून निघाले होते.
कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मंदिरात जाऊन भाविकांना घेता येत नसलं तरी या माध्यमातून आपण ही देवाच मनमोहक रूप घर बसल्या पाहू शकतो.
श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा गाभारा चौखांबी हा सर्व परिसर मोगर्याच्या सुगंधाने दरवळला आहे. युगायुगातून आलेला हा दुर्मिळ योग असून आज एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असा योग आला आहे.
लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित येणाऱ्या माऊलींच्या पादुका यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पंढरपुरात दाखल झाल्या. यावेळी मोजके वारकरी या पालख्यांसोबत होते.