पंढरपूर – आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला… पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर…आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय असं साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मानाचे वारकरी केशव कोलते व त्यांच्या पत्नी इंदूबाई कोलते,
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे उपस्थित होते. तसेच यावेळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते मंदिरात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.