मुंबई – मुंबईतील मुलुंड भागात मराठी महिलेला घर नाकारण्यात आले होते. तृप्ती देवरुखकर यांच्या सोबत हा प्रकार घडला होता. त्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेताच, संबंधीत व्यक्तीने माफीही मागितली. या प्रकरणातील जागृत महिला तृप्ती देवरुखकर यांनी शिवतीर्थवर शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला ठाकरे राज ठाकरे यांच्या पत्नी आहेत.
या संदर्भात बोलताना देवरुखकर म्हणाल्या की, मराठी माणसाला घर नाकारण्याचा अनुभव आल्यानंतर मला सर्वात आधी स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क केला. ते माझ्याबरोबर आले आणि घर नाकारणाऱ्या सचिवाला जाब विचारला. मला त्यांच्याकडून मराठीत माफी हवी होती. माझी दुसरी कोणतीच अपेक्षा नव्हती. तशी त्यांनी मराठीतून माफी मागितली आहे. इतकेच नाही तर सोसायटीच्या सदस्यांनी त्यांना पदावरुन काढून टाकले आहे.
शर्मिला ठाकरे यांच्या भेटीवर त्या म्हणाल्या की, मी धाडसाने पुढे आले म्हणून शर्मिला ठाकरे यांनी माझं कौतुक केले आहे. कारण अनेक मराठी लोकांबरोबर हे प्रकार घडतात, मात्र कुणी बोलत नाही. मी हे प्रकरण समोर आणले. माझ्या मनातील राग व्यक्त केला. याचे शर्मिला ठाकरे यांनी कौतुक केले असल्याची माहिती देखील देवरुखकर यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील मुलुंड परिसरात मराठी भाषिकांना , महाराष्ट्रीयन माणसांना आम्ही इमारतीमध्ये कार्यालय देत नाही असे सांगून त्या इमारतीमधील गुजराती व्यक्तींनी इमारतीमध्ये तृप्ती देवरूखकर या महिलेला घर भाड्याने देण्यास नकार दिला. या संदर्भातील एक व्हिडीओ देवरुखकर यांनी सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर या घटनेवरुन शिवसेना आणि मनसेने राज्य सरकारवर निशाणा साधत साधला.
मुलुंड परिसरात मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक दिल्यानंतर या प्रकरणात जाब विचारल्यावर मारहाण केल्याचाही आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी सोशल मीडियावर केला. मुलुंड पश्चिम परिसरातल्या शिवसदन इमारतीमध्ये आपण भाड्याने कार्यालयासाठी जागा पाहण्यास गेलेली असताना मालकाने आम्ही महाराष्ट्रीयन माणसाला कार्यालय देणार नाही असे सांगून धक्काबुक्की केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी केला.
शिवसेना उद्धव ठकरे गटाकडून याप्रकरणाची दखल घेण्यात आली. मराठी माणसाला घर देण्यास मनाई करणाऱ्यांमध्ये हा एवढा माज कोठून आला? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुलुंडमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीला जाब विचारला. त्या व्यक्तीचे वय पाहता त्याला समजवण्यात आले आणि माफीही मागायला सांगितली.
माझी चूक झाली, मी मराठी माणसाची माफी मागतो असे तो व्यक्ती बोलताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे मुंबईत मराठी पाट्या लावाव्यात असे निर्देश न्यायालयाने दिले असताना दुसरीकडे मराठी माणसांना मात्र परप्रांतियांकडून दुकाने भाड्याने दिली जात नसल्याचे वास्तव समोर आले.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे.
काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
भाजप नेत्या पंकजा मुंडे काय म्हणाल्या –
आत्ताच्या राजकारणाचे वातावरण पाहता मनस्थिती खराब आहे. लोकांकडे साधने आहेत, परंतु अस्वस्थता वाटते. आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहेत. प्रत्येक रंगात माणूस वाटला गेला आहे. हिरवा, भगवा, निळा असे लोकं वाटले गेलेत. एका मराठी महिलेला जागा नाकारण्यात आली. खरेतर भाषा आणि प्रांतवादाच्या राजकारणात मला पडायला आवडत नाही.
माझ्या राजकीय प्रवासात कधीही जातीयवाद, धर्मवाद आणि प्रांतवाद यावर टिप्पणी केली नाही. कुणी कोणत्या भाषेत बोलावे, कोणत्या भाषेत पाटी लावावी यावर मी बोलली नाही. परंतु एक मुलगी रडून तिच्यावर घडलेला प्रसंग सांगते हा प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे.
माझे सरकारी घर सोडून जेव्हा मला घर घ्यायचे होते तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला आहे. मराठी लोकांना घर देत नाही असे ऐकले आहे. मी कोणत्या एका भाषेबद्दल बोलत नाही. मुंबईचे सौंदर्य प्रत्येक भाषेने, धर्माने नटलेले आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे प्रत्येकजण येतोय, परंतु आम्ही मराठी लोकांना घर देत नाही हे जर कोण बोलत असेल तर ते फार दुर्दैवी आहे.
माझ्यासारख्या व्यक्तीलाही हा अनुभव आला आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी केवळ गणपतीचे विसर्जन न करता प्रत्येक नकारात्मक गोष्टीचे विसर्जन करायला हवे. जाती, धर्म, प्रांत या सगळ्या वादाचे विसर्जन करावे असे ठरवू शकत नाही का? माझी भूमिका कुणा एकासाठी नव्हे तर सर्वांनी एक व्हावे यासाठी आहे. असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर काय म्हणाल्या ?
तृप्ती देवरुखकर यांना मराठी भाषिक असल्याच्या कारणावरून मुलुंड, मुंबई येथील शिवसदन सहकारी गृहनिर्माण संस्थेने सदनिका नाकारण्यात आली तसेच याबाबत प्रश्न उपस्थित केल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त मध्यामांवरून प्रसारित होत आहे.
भारतीय राज्य घटनेचे अनुच्छेद 15 अन्वये धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान या आधारावर कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव करता येणार नाही अशी तरदुत करण्यात आली आहे. यामध्ये जात आणि भाषा अनुस्युत आहेत. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये सुद्धा विशिष्ट जाती, धर्म, भाषा यांना गृहनिर्माण संस्थेत घर देऊ नये अशी कोणतीही मुभा संस्थेला देण्यात आलेली नाही.
असे असतानाही बहुतांश सहकारी गृहनिर्माण संस्था विशिष्ट जाती, धर्म, भाषा आणि आहार पद्धती या आधारावर उघडपणे भेदभाव करत आहेत. गृह योजनांच्या जाहिराती आणि वेबसाईटवरही फक्त ‘ गेटेड कम्युनिटी ‘ साठी असे ठळकपणे लिहिलेले असते.याबाबत सहकार विभाग आणि गृहनिर्माण विभाग यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे.
भाषावार राज्य निर्मितीच्या आधारावर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आहे. असे असले तरी, महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठी भाषिक महिलेला सदनिका नाकारली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे.
त्यामुळे ह्या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना चौकशी करून अहवाल मागविण्यात आला आहे.त्याचप्रमाणे याप्रकरणी संबंधित महिलेला भाषेच्या आधारे दुय्यम वागणूक देऊन मारहाण करण्यात आल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
मराठी महिलेला घर नाकारल म्हणून गुजराथी लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.मारवाडी जैन गुजराथी हाउसींग सोसायटी मधे मराठी लोकांना खालच्या दर्जाचे,मांस खाणारे म्हणून घरे मिळत नाहीत.मुंबईत हे सगळ्यांना माहितीच आहे.मुलूंड मधील घटनेनंतर गुजराथी लोकांना हाकलून लावा अशा कमेंटचा पाऊस न्युज खाली पडला.
हेच मराठी लोक जात पाहून शेडुल्ड कास्ट लोकांना घरे नाकारतात.धर्म पाहून मुसलमानांना घर नाकारतात.शेरास सव्वाशेर गुजराथी मारवाडी जैन हे मराठी लोकांना जेव्हा लात घालतो तेव्हा हे किंचाळतात..कटू पण सत्य आहे..