मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद हीच्या कपड्यांवरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आणि दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत चालले आहे. चित्रा वाघ यांच्या मागणीला भीक न घालता उलट उर्फीनेच त्यांच्यावर ट्विट हल्ला चढवला. दरम्यान, या प्रकरणात आता भूमाता ब्रिगेडच्या प्रमूख तृप्ती देसाई यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मात्र या प्रकरणाला धार्मिक रंग असल्याचा संशय व्यक्त करत फक्त उर्फीच कशाला कंगणा रनौत, दीपीका पादुकोण, कतरिना कैफ या अभिनेत्री देखील बोल्ड कपडे घालतात, त्यांच्यावरही टीका करा, असा सल्ला चित्रा वाघ यांना दिला.
या प्रकरणाविषयी बोलताना तृप्ती देसाई यांनी, “आपला देश संविधानावर चालतो. उर्फी जावेदने काय कपडे घालावेत किंवा घालू नयेत. हा तिचा निर्णय आहे. याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी बोल्ड किंवा अश्लील कपडे घातलेले आहेत. मात्र त्यावर कधीही कुणी आवाज उचलला नाही. त्यांच्या बाबतीत आताही बोलले जात नाही. उर्फी जावेदलाच भाजपा का टार्गेट करत आहे. उर्फी जावेद मुस्लीम आहे म्हणून तिला टार्गेट केले जात आहे का?”, असा सवाल उपस्थित केला.
तसेच पुढे त्या म्हणाल्या,’अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने बहाल केलं आहे. तरिही त्याविरोधात तक्रारी दाखल होतात. ज्यांचे सरकार असते, त्यांच्याच लोकांच्या तक्रारीची दखल घेतले जाते. याआदी महाविकास आघाडीचे सरकार असताना केतकी चितळेच्या विरोधात गुन्हे दाखल केले गेले, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला केतकी चितळेला फिरवले गेले. तसेच आता उर्फी जावेदला देखील वेगवेगळे पोलीस स्थानकात फिरवले जाईल. सत्तेचा दुरुपयोग असाच केला जातो.’
माझी पोलिसांना विनंती आहे की, कुणाचे तक्रारी अर्ज आल्यानंतर त्याची दखल घ्या. परंतु योग्य तो न्याय दिला पाहीजे. कायदा सर्वांना समान आहे, त्यामुळे चित्रा वाघ यांना आवर्जून सांगायचे आहे की, कंगणा रनौत, दीपीका पादुकना, कतरिना कैफ अशा कितीतरी अभिनेत्री बोल्ड कपडे घालतात. जर कारवाई करायची असेल तर सर्वांवरच करा. पण विनाकारण उर्फी जावेदला कुणी टार्गेट करत असेल तर आम्ही तिच्यासोबत आहोत.असे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले आहे.