1. महविकास आघाडीचा प्रयोग चुकीचा नव्हता – उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
राज्यात राबवण्यात आलेला महाविकास आघाडीच्या युतीचा प्रयोग चुकीचा नव्हता आणि या प्रयोगाचे लोकांनी स्वागतच केले होते, असे शिवसेना पक्षअध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
2. राज्यात पुन्हा शिवसेनेचा स्वतःचा मुख्यमंत्री असेल – उद्धव
महाराष्ट्रात फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घ्यायच्या नाहीत तर विधानसभा निवडणुकाही नव्याने घ्याव्या लागणार आहेत आणि त्यानंतर राज्यात पुन्हा शिवसेनेचा स्वतःचा मुख्यमंत्री असेल. असा दावा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातील मुलाखतीत बोलताना केला.
3. कर्नाटकात भाजपयुमो पदाधिकाऱ्याची हत्या
कर्नाटकात भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रविण नेत्तारू यांची हत्या करण्याचा प्रकार घडल्यानंतर त्या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तेथे या प्रकारावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील आपल्याच पक्षाच्या सरकारच्या विरोधात निदर्शने केल्याचे वृत्त आहे.
4. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा लवकर निकाल लावा – कॉंग्रेसची मागणी
सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल हेराल्ड-असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड प्रकरणाशी संबंधित खटला लवकर निकाली काढावा, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. केंद्र सरकारकडून मनी लॉंडरिंग कायदा हा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी आणि अपमानित करण्यासाठी वापरला जात आहे, असा आरोप करून कॉंग्रेसने ही मागणी केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाबाबत सध्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी सुरु आहे.
5. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे शिवसैनिकांकडून जोरदार सेलिब्रेशन
शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे राज्यभरातील शिवसैनिकांनी जोरदार सेलिब्रेशन केले. ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.
6. गुजरात विषारी दारू मृत्यू प्रकरणातील मृतांची संख्या आता 40
गुजरातच्या बोटाड जिल्ह्यात गेल्या 12 तासांत आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने बनावट दारूच्या सेवनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. मृतांपैकी 31 जण हे बोताडमधील वेगवेगळ्या गावातील असून नऊ जण अहमदाबाद जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत, असे बोताड पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात जटुभा राठोड नावाच्या इसमाला पकडण्यात आले आहे.
7. तृणमूलच्या 38 आमदारांचे आमच्याशी चांगले संबंध
भाजपच्या मिथुन चक्रवर्ती यांचा दावा
ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या एका विधानाने प. बंगालमध्ये खळबळ निर्माण केली आहे. बंगालच्या सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या 38 आमदारांचे भाजपशी चांगले संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजपच्या कोणा नेत्याने हे असे वक्तव्य केले आहे.
8. कॉंगोत बीएसएफचे 2 जवान शहिद
शांतीसैनिकांवर हिंसक आंदोलकांचा हल्ला
कॉंगोमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांतिसैन्यात सामील असलेले भारताचे दोन जवान हिंसक आंदोलनादरम्यान शहिद झाले आहेत. हे दोन्ही जवान सीमा सुरक्षा दलाचे जवान होते, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या दोन्ही जवानांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच या हल्ल्याला जबाबदार असलेल्या हिंसक आंदोलकांना जबाबदार धरण्यात यावे आणि कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
9. राजपक्षेंच्या सिंगापूरमधील मुक्कामाला मुदतवाढ
श्रीलंकेचे माजी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना दिलेल्या व्हिसाची मुदत सिंगापूरने आणखीन 14 दिवसांसाठी वाढवली आहे. आता राजपक्षे यांना 11 ऑगस्टपर्यंत सिंगापूरमध्ये मुक्काम करता येणार असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाचे सचिव बंदुला गुणवर्देना यांनी कालच राजपक्षे लवकरच श्रीलंकेत परत येणार असल्याचे म्हटले होते. राजपक्षे हे कोठेही लपून बसलेले नाहीत आणि त्यांनी पलायनदेखील केलेले नाही, असेही गुणवर्देना म्हणाले होते.
10. जागतिक टी-20 लीगमध्ये आयपीएलची मक्तेदारी धोकादायक – गिलख्रिस्ट
जागतिक क्रिकेटमध्ये आयपीएलच्या फ्रॅंचायझींचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून मक्तेदारी करण्याचा सध्याचा ट्रेंड धोकादायक आहे, असे मत दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने व्यक्त केले आहे.