पिंपरी चिंचवड : प्लॅस्टिकचा भस्मासूर या विषयावर असंख्य वाचकांनी प्रतिक्रिया पाठविल्या. या प्रतिक्रियांमधून एकच सूर उमटला असून प्लॅस्टिकचे उत्पादनच झाले नाही तर ते बाजारातच येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने प्लॅस्टिक पिशव्या उत्पादन होत असलेल्या ठिकाणी कारवाई करावी. बहुतांशी वाचकांनी प्लॅस्टिक पिशव्यांना कागदी आणि कापडी पिशव्यांचा पर्याय सुचविला आहे. यासाठी बचत गटांची मदत घ्यावी, असे आवाहन महापालिकेला केले आहे. महापालिका नागरिकांचे प्रबोधन करण्यात कमी पडत असल्याचेही काही वाचकांनी अधोरेखित केले आहे. काही वाचकांनी अगदी अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया पाठविल्या आहेत. त्यातून सहज करता येतील अशा उपाययोजनाही सांगितल्या आहेत. काही वाचकांनी दंडाची जी रक्कम घेतली जाते त्याच किंमतीच्या कापडी पिशव्या दंड केलेल्या व्यापाऱ्याला द्याव्यात, असाही पर्याय सूचविला आहे. एका वाचकाने एटीएम मशीन प्रमाणे मंडई आणि गर्दीच्या ठिकाणी पिशव्यांचे एटीएम सुरू करावे, अशी सूचना केली आहे. चिखलीतील एका शाळेने केवळ विचार करीत बसण्यापेक्षा चांगल्या उपक्रमास सुरुवात केली आहे. या शाळेचा आदर्श इतरांनीही घ्यायला हवा. तसेच लहानपणीच प्लॅस्टिक न वापरण्याचे संस्कार झाले, तर पुढील पिढी प्लॅस्टिक वापरणारच नाही, असे म्हटले आहे.
प्लॅस्टिकमुळे शहराचे प्रदूषण वाढत आहेच, शिवाय उद्यान, नदी, नाले, तलाव, रस्ते आदी ठिकाणी पडलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, बॉटल्समुळे शहराच्या विद्रुपीकरणातही भर पडली आहे. शहरातील बहुतांशी दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू झालेल्या उद्योगनगरीला महापालिकेच्या वेळकाढू भूमिकेमुळे प्लॅस्टिकचे ग्रहण लागले आहे. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करीत त्यांच्यावर निर्बंध घालण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. परंतु या दुकानदारांकडून केवळ दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे मनपाचे पथक दंडात्मक कारवाई करून परतले की, पुन्हा प्लॅस्टिकचा वापर सुरू होतो ही स्थिती आहे. दुकानातूनच प्लॅस्टिक पिशवी मिळत असल्याने वापर करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांकडून हेच प्लॅस्टीक कधी रस्त्यावर तर कधी उद्यान, गटार किंवा नाल्यात फेकले जात असल्याने शहराच्या प्रदुषणाचा प्रश्न अधिकच जटील बनत चालला आहे.
एकूण कचऱ्यापैकी आठ टक्के प्लॅस्टिक
प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पिंपरी चिंचवड शहरातून दररोज गोळा होणाऱ्या 1100 टन कचऱ्यापैकी 88 टनापेक्षा अधिक प्लॅस्टिकचा कचरा निघत आहे. शहरातील कचरा वेचकांमुळे यापैकी सहा टक्के कमी होऊन त्याचा पुनर्वापर होतो. महापालिकेकडे उर्वरित सिंगल यूज प्लॅस्टीक कचऱ्यावर प्रक्रियेची कोणतीच सुविधा नसल्याने डम्पिंग ग्राऊंडवर हे प्लॅस्टिक फेकले जाते. हे प्लॅस्टिक हलके असल्याने वाऱ्यामुळे आसपासच्या परिसरातील वस्त्यांमध्ये ते जात असल्याने त्याचा फटका रहिवाशांनाही बसत आहे. तर कचरा डेपोच्या परिसरातील अनेक रस्त्यावर हे प्लॅस्टिक हवेने उडून जात असल्याने विद्रुपीकरणही वाढत आहे.
ड्रेनेज, सिवेज लाइनसाठी घातक
रस्त्यावर फेकून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्या उडून ड्रेनेज, सिवेज लाइनमध्ये शिरत आहेत. परिणामी ड्रेनेज लाइन, सिवेज लाइन तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. तुंबलेल्या ड्रेनेज, सिवेज लाइनची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे प्लॅस्टिक अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये जावून बाहेर काढावे लागत आहे. तुंबलेल्या लाइन दुरुस्त करेपर्यंत घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याने त्यातून आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. प्लॅस्टिक बंदीची जबाबदारी ज्या आरोग्य विभागावर आहे त्याच विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यंत धोकादायक स्थितीत काम करावे लागत असल्याने हे कर्मचारीदेखील आपल्या वरिष्ठांवर नाराजी व्यक्त करताना पहावयास मिळत आहे.
प्रक्रियेचा अभाव, आगीच्याही घटना
कमी जाडीच्या पिशव्यांचा पुनर्वापर शक्य आहे. प्लॅस्टिकच्या बॉटल, बाटलीचे तुकडेही मोठ्या प्रमाणात कचऱ्यात दिसतात. परंतु महापालिकेकडे त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच नाही. प्लॅस्टिकपासून इंधन निमिर्तीचा प्रकल्प महापालिकेने राबविला. मात्र, त्यासाठी कचऱ्यातील प्लॅस्टिक नको असून दर्जेदार प्लॅस्टिक हवे आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडमध्ये या प्लॅस्टिकचा ढिगारा लागला आहे. यातून मोशी येथील डम्पिंग ग्राऊंडवर सतत आगीच्या घटना घडत असून यामुळे वायुप्रदूषणाचा धोका वाढला असल्याने शहरात विदारक चित्र निर्माण
झाले आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये गांभीर्याचा अभाव
प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागावर आहे. या विभागाने शहराच्या भागानुसार पथकांची निर्मिती केली असली तरी नावापुरती कारवाई करण्यातच या पथकांकडून धन्यता मानली जात आहे. अत्यंत गांभिर्याने आणि कठोर कारवाईद्वारे प्लॅस्टिक बंदीची जोपर्यंत अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत चोरट्या पद्धतीनेच नव्हे तर राजरोस पद्धतीने प्लॅस्टिकचा वापर होतच राहणार हे कटूसत्य आहे. महापालिका कर्मचाऱ्यांची बेफिकीरी, चिरीमिरी घेण्याची वृत्ती जोपर्यंत मुळापासून संपुष्टात येणार नाही तोपर्यंत शहराच्या पर्यावरणाला धोका राहणार हे सत्य आहे. त्यामुळे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच आता यामध्ये लक्ष घालण्याची गरज वर्तविण्यात येत आहे.
वायूप्रदूषणात भर
शहरात जमा झालेले प्लॅस्टिक अनेकदा जाळताना दिसून येते. त्यामुळे वायू प्रदूषणातही भर पडली आहे. कचरा जाळणे हा गुन्हा असतानाही प्लॅस्टिक जाळले जाते. यातून क्लोरिन, ब्रोमाईनची निर्मिती होत असून, वायुप्रदूषणामुळे पृथ्वीच्या आवरणालाही गंभीर धोका आहे. पर्यावरण आणि आरोग्य अशा दोन्ही पातळ्यांवर शहराला गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे.
जनावरांवर परिणाम
शहरातील गायी, म्हशी मोठ्या प्रमाणात अन्नाच्या शोधात शहरभर फिरत असतात. याशिवाय अनेक जण शिळे अन्न, निवडलेल्या भाजीचे देठ प्लॅस्टिक पिशव्यांतून कचरा फेकतात. या पिशव्यांमधील अन्न खाणारे जणावरे प्लॅस्टिकच्या पिशव्याही गिळत असल्याने जणावरांनाही मोठा धोका होत आहे. अकाली मरण पावणाऱ्या जणावरांमध्ये सर्वाधिक मृत्यू हा प्लॅस्टिकच्या खाण्यामुळे होत असल्याचे पशू वैद्यकीय विभागाच्या अहवालाने स्पष्ट केले.
विकेत्यांवर कारवाई करा
प्लॅस्टिकच्या वापराबाबत महापालिकेला जनजागृती करण्याची गरज नाही. फक्त प्लॅस्टीक विक्रेत्यांवर कडक कारवाई केली तरी सर्वसामान्य नागरिक प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर सुरू करतील. त्यामुळे कठोर कारवाईची भूमिका महापालिकेने घ्यायला हवी.
प्रमोद लांडे
थेट मुळावरच घाव घाला
प्लॅस्टीक पिशव्यांचा वाढता वापर हा धोकादायक आहे. मात्र महापालिका, राज्य आणि केंद्र शासनाने या समस्येच्या मुळावरच घाव घातला पाहिजे. ज्या कारखान्यांमधून या पिशव्यांची निमिर्ती होते, तेथील मशीन शासनाने जप्त केल्या पाहिजेत. तसेच नागरिकांनीही कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला पाहिजे.
मनिषा परांडे
नागरिकांची भूमिका महत्त्वाची
प्रशासनाने कितीही जनजागृती केली आणि दंडात्मक कारवाई केली तरी जोपर्यंत नागरिकांची मानसिकता बदलत नाही. तोपर्यत प्लॅस्टीकचा वापर सुरू राहणारच. त्यामुळे प्लॅस्टिक विरोधी मोहिमेत नागरिकांची स्वत:हून भूमिका घेणे महत्वाचे आहे.
– प्रमोद येवले
मुक्या जनावरांचा तरी विचार करावा
आपल्याला काही त्रास झाल्यास आपण डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतो. मात्र, मुक्या जनावरांना प्लॅस्टीकपासून त्रास झाल्यावर ते कसे सांगणार? किमान मुक्या जनावरांचा विचार करून तरी प्लॅस्टिकचा वापर थांबवावा.
– यशवंत कन्हेरे
प्रत्येक गोष्टीला पर्याय
समाजात प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. तसाच प्लॅस्टीकलाही पर्याय आहे. नारळाचे पाणी पिण्यासाठी स्टीलचा ग्लास वापरू शकतो. तसेच इतर गोष्टींनाही अशाच प्रकारे पर्याय निवडू शकतो. फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची.
– श्रीकृष्ण भोसले
त्रिसूत्रीचा वापर करावा
नागरिक आणि प्रशासनाने त्रिसूत्रीचा (ठशर्वीलश, ठर्शीीश, ीशलूलश्रश) वापर केल्यास प्लॅस्टीकच्या समस्येवर मात करणे शक्य आहे. सार्वजनिक ठिकाणी रिसायकल मशिन ठेवल्यास या समस्यावर मात करणे सोपे होईल.
मनिषा कलशेट्टी
कापडी पिशव्यांच्या मशिन बसवाव्यात
ज्याप्रमाणे बॅंकांकडून ठिकठिकाणी एटीएम मशिन बसविल्या आहेत. त्याप्रमाणे दहा रुपयांचे नाणे टाकल्यावर कपड्यांची पिशवी उपलब्ध करून देणारी मशीन भाजी मंडई किंवा बाजारपेठेत ठेवावी. त्यातून बचत गटांना पिशव्या शिवण्याचे उत्पन्नाचे साधनही निर्माण होईल.
विक्रांत ओतारी
विचार करा पक्का
पूर्वी निवडणुकीत ताई, माई, अक्का विचार करा पक्का, अशी वाक्ये ऐकू येत होती. त्याप्रमाणे आताही या ताई, माई, अक्काने मनाशी निर्णय पक्का करून प्लॅस्टीकच्या ऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचा निर्धार करावा. सवय लागेपर्यंत त्रास होईल, मात्र त्यामुळे भविष्य उज्वल होईल.
भावना क्षिरसागर
पैसे कमविण्याचे साधन
प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी हा निर्णय महापालिकेला पैसे कमविण्याचे साधन झाले आहे. जर खरोखरच प्लॅस्टिकवर बंदी हवी असेल तर प्लॅस्टीक निर्माण करणारे कारखाने, गोदामे यावर छापा घालायला हवा. जर प्लॅस्टीक उपलब्ध झाले नाही तर नागरिक त्याला पर्याय आपोआप शोधून काढतील.
राहूल पांडे
पुनर्वापर प्रकिया करणाऱ्यांना प्राधान्य द्यावे
प्लॅस्टीकवर पुनर्वापर प्रकिया करणाऱ्यांना संस्था आणि लघु उद्योगांना प्राधान्य द्यावे. अशा संस्थांना महापालिकेने आर्थिक पाठबळही द्यावे. कारण प्लॅस्टीकचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
गणेश ढोरे
कापडी पिशव्या आणि इको ब्रिक्स
चिखलीतील श्री दादा महाराज नाटेकर विद्यालयात एक उपक्रम राबविण्यात येत आहे. या शाळेमध्ये कापडी पिशव्या शिवून घेण्यात येतात तसेच या पिशव्या पालकांना वापरण्यास दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरातील प्लॅस्टिक कचरा शाळेत गोळा केला जात असून त्याद्वारे इको ब्रिक्स तयार करण्यात येतात. या ब्रिक्सचे झाडांना आळे, कमळाचे तळे करण्यासाठी वापर होतो. तर दुधाच्या पिशव्यांपासून पाच हजार रोपांची रोपवाटिका शाळेत तयार करण्यात आली आहे. शाळेकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे पर्यावरण प्रेमींकडून स्वागत होत असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक गौतम इंगळे यांनी दिली.
दंडाच्या ऐवजी कापडी पिशव्या द्या
प्लॅस्टीकच्या मोहजाळात आपण अडकत चाललो आहोत. प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर केल्यास महापालिका दुकानदार आणि नागरिकांनाही दंड करते. त्याऐवजी दंडाची रक्कम घेऊन संबंधित दुकानदार किंवा नागरिकाला त्याच पैशाची कापडी पिशवी उलब्ध करून दिल्यास या समस्येवर मात करणे सहज शक्य आहे.
-प्राजक्ता निफाडकर
प्लॅस्टिक बंदीबाबत शंका
जर प्लॅस्टीकवर बंदी असूनही शहरात सर्वत्र त्या दिसत आहेत. तर मग बंदीबाबत शंका उपस्थित होत आहे. बंदी असलेले प्लॅस्टिक शहरात येतेय कुठून याचा शोध आत्तापर्यंत महापालिका प्रशासनाने घेतला पाहिजे होता. केवळ दंड करून उपयोगी नाही तर वेळप्रसंगी फौजदारी दाखल करायला हवी.
-अपर्णा ढोरे
प्रथम पर्याय उपलब्ध करून द्या
प्लॅस्टीकच्या पिशव्या नागरिक मोठ्या प्रमाणात वापरतात. कारण त्या सहज उपलब्ध होतात. त्याप्रमाणे महापालिकेने नागरिकांना पुरेशा प्रमाणात कापडी किंवा ज्यूट बॅग उपलब्ध करून दिल्यास नागरिक हळूहळू त्याकडे वळतील.
शालेय अभ्यासक्रमात माहिती हवी
शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण शास्त्र या विषयामध्ये प्लॅस्टीकला पर्याय या विषयावर विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. प्लॅस्टिकच्या दुष्परिणामाबाबत नागरिकांच्या मनात जनजागृती करणे महत्वाचे आहे.
-मोना शेळके
सूज्ञ नागरिक पर्यायाचा वापर करतात
प्लॅस्टीक हे घातक असल्याचे माहिती असल्याने सूज्ञ नागरिक आजही कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करीत आहेत. मात्र उत्पादनाबाबत नियम अधिक कडक होणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात महापालिका कमी पडत आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही.
-मधुकर बच्चे
कागदोपत्री बंदी नको
सरकार गुटखा, प्लॅस्टिक अशांच्या वापरावर बंदी घालते. मात्र त्याच्या उत्पादनावर बंदी घालत नाही. मुळात उत्पादनच बंद झाले तर प्लॅस्टिक बाजारात दिसणार नाही. जे चोरून-लपून उत्पादन करतात अशांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
-किरण जाधव
बालवयातच संस्कार करा
प्लॅस्टीकचे दुष्परिणाम काय आहेत, त्यापासून भविष्याला कसा धोका आहे हे बालवयातच मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. जेणेकरून ही लहान मुले आपल्या आई-वडिलांना प्लॅस्टिक वापरू देणार नाही आणि भविष्यात आपणही वापरणार नाही.
-अनिता धाक्रस
प्लॅस्टीक वापरण्याचे बाळकडूच
लहान मुल जन्माला आले की त्याला प्लॅस्टिकच्या बाटलीतून दूध आणि बिस्किट दिले जाते. जणूकाही त्यांना बाळकडूच दिले जाते. यामुळे याला पर्याय काचेची बाटली ठरू शकते. मानवाने स्वतःच्या सुविधेसाठी निर्माण केलेल्या काही वस्तू मानवाच्या जिवावर उठणार आहेत. -राजकुमार शेडगे
कागदी पिशव्यांचा वापरही धोकादायक
कागदी पिशव्यांसाठी लागणारा कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागेल. यामुळे कागदी पिशव्यांचाही पर्यावरणाला एकप्रकारे धोका आहे. प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले आणि ते प्रामाणिकपणे राबविले तर प्लॅस्टीकचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
-गणेश घाटे
ग्राहकास सशुल्क कापडी पिशवी द्यावी
सध्या मॉलमध्ये गेल्यावर जर आपण पिशवी आणली नसेल तर मॉलमधून विकत कापडी पिशवी दिली जाते. हे माहिती पडल्यावर बहुतांश ग्राहक आपल्यासोबत पिशवी नेऊ लागले आहेत. असेच धोरण प्रत्येक दुकानदाराने राबविले पाहिजे.
-ऍड. दत्ता झुळूक
व्यापक जनप्रबोधनाची गरज
प्लॅस्टिकचा हा भस्मासूर असल्याचे सांगत दै. प्रभातने जनजागृतीचा हा विषय चर्चेसाठी दिला आहे. अशाच प्रकारे महापालिका प्रशासनाने समाज प्रबोधनाची मोठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. केवळ बंदी बंदी म्हणून हा विषय मार्गी लागणार नाही.
-मजीद शेख
फांद्या छाटून उपयोग नाही
प्लॅस्टिकची समस्या दूर करायची असेल तर केवळ बंदी घालून फांद्या छाटून उपयोग नाही. तर उत्पादन सुरू असलेल्या ठिकाणी मुळावरच घाव घाला. अशा ठिकाणी कामगार बेरोजगार होण्याची भिती बाळगू नका.
-राजू भालेराव
केवळ 20 टक्के प्लॅस्टिकचा पुनर्वापर
जगात निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिकपैकी केवळ 20 टक्के प्लॅस्टिकचा पुनर्वापर होत आहे. म्हणजे 80 टक्के प्लॅस्टिक तसेच पृथ्वीवर पडून राहते ज्याचे शेकडो वर्ष विघटन होत नाही. दरवर्षीय हा कचरा वाढत जाऊन पृथ्वीचे अस्तित्व यामुळे धोक्यात येऊ शकते.
-विशाखा नागोसे
राजकीय इच्छाशक्तीची जोड हवी
प्लॅस्टीकची खेळणी, शितपेयाच्या बाटल्या याला पत्रा हा पर्याय आहे. प्लॅस्टिक बंदीची केवळ घोषणा करून चालणार नाही. त्याच्या अंमलबजावणीसाठी राजकीय इच्छाशक्तीही गरजेची आहे. कारण महापालिकेने दुकानदारावर कारवाई केल्यास नेतेमंडळी दुकानदारांसोबत लगेच विरोधाला पुढे येतात.
-विलास पाडळे
दुकानदारांनीच प्लॅस्टिक पिशवी देणे बंद करावे
बंदी घालूनही प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर सुरू आहे. कारण दुकानदार पिशव्या देतात म्हणून ग्राहक आणत नाही. केवळ वापरावर बंदी नको असून उत्पादनावरही बंदी घाला. प्लॅस्टीक पिशवीला कापडी पिशवी उत्तम पर्याय आहे.
-डॉ. शुभांकर वाघेरे
इको फ्रेंडली वस्तूचा वापर करणे गरजेचे
आज बाजारात अनेक वस्तू इको फ्रेंडली उपलब्ध आहेत. सध्या त्या महाग असल्या तरी भविष्याचा विचार करून त्यांची किंमत मोजतोय, असे समजून त्या विकत घ्याव्यात, इको ब्रिक्स तयार करावेत. बाहेर जाताना काहीही खरेदी करायची नसली तरी कापडी पिशवी सोबत ठेवावी.
-मिलिंद चौधरी
बंदी सोपी, कृती अवघड
प्लॅस्टीकवर कागदोपत्री बंदी घालणे सोपे आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करणे सध्यातरी कठीण असले तरी अशक्य नाही. प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन करणाऱ्यांना दंड तर कापडी पिशव्यांचे उत्पादन करणाऱ्यांना अनुदान दिले पाहिजे.
-आनंदा कुदळे