आपण बऱ्याच वेळा आपला हेतू साध्य करण्यासाठी बरेच काही जुळवून आणतो, अडचणींवर मात करण्यासाठी काहीतरी उपाय योजना करतो, अशाच प्रयत्नांत आपण “जुगाड’चा आधार घेत असतो. नेमके याच जुगाडविषयी थोडेसे…
आपल्यास रोजच कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावेच लागते. या समस्यांना सामोरे जाताना आपल्याला त्यावर काही उपाय योजावाच लागतो. आपण प्रत्येक क्षेत्रात काही तज्ज्ञ नसतो, प्रत्येक क्षेत्रातील कौशल्य आत्मसात असतेच असे नाही. आपणास काम तर पूर्ण करावयाचे असते, अडचणी आल्या तर तेथेच थांबून कसे चालेल? आपल्याला काहीतरी मार्ग शोधताना आपले कौशल्य पणास लावावे लागते.
अडचणी सोडवताना आपल्याला प्रत्येकवेळी योग्य ती साधनसामग्री उपलब्ध होईलच असे नाही, प्रत्येक वेळी योग्य ती व्यक्ती उपलब्ध होईलच असे नाही. आज आपण स्कूटर वापरतो. पण स्कूटर पहिल्यांदा जी बनविली गेली ती जर्मनीमध्ये 1900 सालच्या सुमारास इटलीमधील युद्धात निकामी झालेल्या विमानाच्या सुट्याभागापासून गरजेपोटीच बनविली गेली. प्रवासासाठी एक साधन असणे आवश्यक बनले त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीतून मोडक्या विमानाच्या सुट्या भागांचा योग्य तो उपयोग करून एक साधन बनविले ते असेच जुगाडकरूनच. ती बनविलेली स्कूटर ओबडधोबडच होती. पण त्यामुळे गरज भागली.
केवळ यंत्रच असे नव्हे तर दोन भिन्न कौशल्याच्या दोन भिन्न व्यक्ती एकत्र येऊन एखादे चांगले काम करू शकतात. जसे कोणी एखादा उत्पादन करण्यात तरबेज असतो तर कोणी विक्री करण्यात, जेव्हा या दोन व्यक्ती एकत्र येतात त्यावेळी दोघांचाही फायदा होतो. अशाच प्रकारे कितीतरी गीतकार-संगीकारांच्या जोड्या आपण पाहिल्या आहेत. ग. दि. माडगुळकर व सुधीर फडके, जगदीश खेबूडकर व राम कदम अशा आणखीनही जोड्या शोधता येतील.
आपण जुगाड करताना पहावे की ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे ना. ते कायद्याच्या चौकटीत बसत आहे ना. बरेच जण वाहनांमध्ये त्यांच्या सोयीने बदल करून घेतात आणि रस्त्यावर आणतात असे वाहन आपल्याबरोबरच इतरांनाही घातक ठरू शकते. याशिवाय बऱ्याचवेळा जुगाड हे कामचलाऊ असते. जी तात्पुरती व्यवस्था केलेली असते ती सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसते. कधी एखादे यंत्र बिघडते ते यंत्र दुरुस्त करण्याकरीता जो कोणी तंत्रज्ञ येतो तो कामचलाऊ काम करून यंत्र सुरु करून देतो. त्या यंत्रावर तो स्वतः काम करणार नसतो, तर दुसरा कोणी काम करणारा असतो.
अशी केलेली कामचलाऊ दुरुस्ती त्या यंत्र चालकाच्या जीवावर बेतू शकते. केवळ आपल्याला काही हानी नाही म्हणून दुसऱ्याच्या जीवाशी खेळून चालणार नाही. जेथे योग्य व अचूकतेने काम करणे आवश्यक असते तेथे कुठलीही तडजोड करून चालणार नाही. इंग्लंडहून स्पेनला 10 जून 1990 रोजी एका विमानाने हवेत झेप घेतली. विमान हवेत असताना विमानाची पुढची काच निघाली आणि आतला एक वैमानिक अक्षरशः अर्धा आत आणि अर्धा बाहेर अशा लटकलेल्या अवस्थेत वीस मिनिटे होता. त्या वैमानिकाचा एक पाय पट्ट्यात अडकल्याने तो बाहेर फेकला गेला नाही. ते विमान तातडीने साउथ हॅम्टन येथे उतरवावे लागले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सदर घटनेच्या चौकशीअंती असे लक्षात आले की, “ती काच बसविताना जे स्क्रू वापरले गेले ते जसे अपेक्षित होते तसे नव्हते, अपेक्षित मानंकानुसार नव्हते.’ ज्या तंत्रज्ञाने स्क्रू वापरले ते कामचलाऊ आणि इतर कोणत्यातरी उपकरणाला वापरण्याचे स्क्रू वापरले व काम पूर्ण केले. ते विमान उड्डाणासाठी सज्ज करण्यापूर्वी काय तपासणी केली गेली? त्या काचेची दुरुस्ती ज्याने केली त्याने असे कामचलाऊ काम केलेच कसे? दुरुस्ती करताना योग्य ती सामग्री का वापरली गेली नाही? असे जुगाड कुठेही करून कसे चालेल? त्या विमानातील प्रवासी, कर्मचारी या सर्वांचे प्राण या जुगाडामुळे पणाला लागले गेले. त्यामुळे जुगाड करताना आपण कोणत्या पातळीवर काम करत आहोत याचे भान हे ठेवायलाच हवे. आपल्याच मानाने आपल्याला सांगायला हवे की, “असे जुगाड येथे करू नकोस’.
आपण जेव्हा नेतृत्व करत असतो त्यावेळी अनेक व्यक्तींबरोबर काम करत असतो. अशा प्रत्येक व्यक्तीच्या जमेच्या, उणिवेच्या बाजू, प्रत्येकाचे स्वभाव दोष आपल्याला माहीत असणे आवश्यक असते. आपला हेतू साध्य करण्यासाठी कोणत्या व्यक्तीवर कोणती जबाबदारी सोपवावी याचा पूर्ण अंदाज आपल्याला हवा. प्रत्येक व्यक्ती ही उपयोगीच असते. फक्त त्या व्यक्तील गुणदोषांचा उपयोग करून घेणारा हवा असतो.
अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्।
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः।।
स्थूलार्थ : ज्यातून मंत्र तयार होऊ शकत नाही असे एकही अक्षर नाही. त्याचप्रमाणे ज्यातून औषधी तयार करता येणार नाही असे एकही मूळ अस्तित्वात नाही. त्याचप्रमाणे कुठेही उपयोगी पडू न शकणारा असा एकही पुरुष या जगात नाही. वाण आहे ती फक्त चांगल्या योजकाची. प्रत्येक गोष्टीचा जगात काही ना काही उपयोग निश्चितच करून घेता येऊ शकेल. पूर्णपणे निरुपयोगी असे काहीच नाही. फक्त त्या वस्तूचा योग्य कारणाकरता उपयोग करून घेणारा योजक मात्र पाहिजे. वाणवा असते ती अशा योजकाचीच आणि हे जगात सगळीकडेच बघायला मिळते.
आपण जुगाड करताना आपल्यालाही वर सांगितल्याप्रमाणे योजकाची भूमिका चोख बजाविता आलीच पाहिजे. म्हणून आपल्याकडे असलेल्या वस्तू टाकून देण्यापूर्वी त्याचा काही उपयोग होऊ शकतो का याचा विचार करावा, कधी एखाद्या यंत्राचा छोटा सुटाभाग दुसऱ्या यंत्राला अगदी चपखल बसून जातो आपले काम होऊन जाते. जुगाड करण्यासाठी आपण आपली मानसिकता तशी ठेवली पाहिजे.
आपण काही जुगाड करतो ते आपले एखादे अडलेले काम पुढे नेण्यासाठी, पैसे वाचविण्यासाठी, आपल्या सोयीसाठी. आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसून आपल्या मनोदेवतेला आपल्या प्रयत्नांचे, कौशल्याचे, ज्ञानाचे पुष्प अर्पण केल्यास आपल्याला काही जुगाड चांगले जमू शकते. कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी कोणताही एक घटक उपयोगी पडत नाही, तर बरेच घटक एकत्र आल्यावर यशस्वी होते. जुगाडाचेही असेच आहे.
– अनिकेत भालेराव