पिरंगुट -भान ठेवून उत्सव साजरे करणे गरजेचे आहे. मुळशीतील पोलीस पाटील सक्रिय असून त्यांना एक वलय निर्माण झाले आहे. शांततेत व कायदा सुव्यवस्थेचे पालन उत्सवाचा आदर्श मुळशी पॅटर्न समाजाला दाखवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन तहसीलदार अभय चव्हाण यांनी केले.
पौड (ता. मुळशी) येथे पौड पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी गणेशोत्सव व दहिहंडी उत्सव मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार अभय चव्हाण बोलत होते. बैठकीस हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, उपनिरीक्षक रेखा दुधभाते, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पवळे, संजय पिंगळे, संदेश हरगणे, आबासाहेब शेळके, मुनीरभाई मुलाणी, ज्ञानेश्वर डफळ, सतीश सुतार, दीपक करंजावणे, पोलीस शंकर नवले, संजय सुपे, विविध गावचे पोलीस पाटील, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुळशीची संस्कृती चांगली असून समाजाला घडविण्याचे कार्य गणेशोत्सव मंडळानी केले पाहिजे. मुळशीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच जाहिरात फलकावरून कोठेही वाद होता कामा नसून गणेश मंडळांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचे मत डॉ. सई भोरे पाटील यांनी व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ म्हणाले, सांगली व कोल्हापूर येथे पुराने नुकसान झाले आहे. गणेश मंडळांनी अवास्तव खर्च न करता पूरग्रस्त भागात मदत करावी. डॉल्बी व डीजे वाजविण्यावर बंदी असून वेळेत मिरवणूक संपली पाहिजे. तसेच महिलांची छेडछाड होता कामा नये. ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर गणेशोत्सव काळात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जबरदस्तीने वर्गणी गोळा केल्यास त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. यावेळी प्रदीप पाटील, ज्ञानेश्वर डफळ, मुनीरभाई मुलाणी, पप्पू कंधारे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचलन पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते यांनी केले. पोलीस नाईक संजय सुपे यांनी आभार मानले.