दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या । कौडगाव ग्रामस्थांचे आंदोलन
नगर – तालुक्यातील खांडके येथील दिव्यांग शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे व चारा छावण्या बंद केल्याने आत्महत्या केली. लक्ष्मण संपत गाडे (वय-35) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील एकाच महिण्यात चारा छावण्याचा दुसरा बळी गेल्याची घटना घडली आहे.
शेतकरी लक्ष्मण संपत गाडे (वय 35) याने आज पहाटे शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुष्काळी परिस्थितीत शासनाने सुरू केलेल्या चारा छावण्या व पाण्याचे टॅंकर बंद केल्याने निराश होवून लक्ष्मण गाडे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप खांडकेचे उपसरपंच पोपट चेटे यांनी केला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी नगर-पाथर्डी महामार्गावर कौडगावध्ये “रास्ता रोको’ केला. प्रशासनाने गावातील चारा छावणी बंद केल्याने आणि पाण्याच्या टॅंकरच्या खेपा निम्याने कमी केल्याने जनावरांचे हाल होत असल्याने त्याने निराश होऊन आपली जीवन यात्रा संपवल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आणि स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
मृत गाडे यांनी कालच गावातील काहीजणांना प्रशासन आणि शासनाच्या धोरणाबद्दल निराश असल्याचे बोलले होते. गेल्या पंधरा दिवसातील नगर तालुक्यातील चारा छावणी आणि पाणी बंद केल्याच्या निषेधार्थ झालेली ही दुसरी आत्महत्या आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाबद्दल प्रचंड नाराज असून, येत्या रविवार आणि सोमवारी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नगर जिल्ह्यात येत असताना या नाराजीचे पडसाद मुख्यमंत्र्याना दिसतील, असा इशारा देण्यात आला आहे.
मागील पंधरा दिवसापूर्वीही तालुक्यात अशीच घटना घडली होती. मात्र, त्या शेतकऱ्याला प्रशासनाकडून अद्यापही मदत मिळाली नाही. आता पुन्हा तालुक्यात अशी घटना घडल्याने शेतकऱ्यामधून संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहुन न्याय मिळवून देवू
संदेश कार्ले , जिल्हा परिषद सदस्य