पुणे (गणेश आंग्रे) – वाढते नागरिकरण, औद्योगिकीकरण, आयटी पार्क, जवळच मुंबई आणि प्रस्तावित रिंगरोडसारख्या सुविधांमुळे वाहतूक व्यवस्थेची सुलभता. या आणि अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील जमीन, सदनिका, दुकाने मालमत्ता खरेदीत मुळशी तालुका अव्वल राहिला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दस्तनोंदणी मुळशी तालुक्यात झाली असून, 23 हजार दस्तनोंदणीतून शासनाला 251 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
जिल्ह्यातील 12 तालुक्यांत दि. 1 एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंत एकूण 1 लाख 31 हजार 232 दस्त नोंदणी झाली आहे. यामधून शासनाला 851 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर मुळशीपाठोपाठ मावळ, दौंड आणि खेड तालुक्याचा क्रमांक लागतो.
नोंदणी व मुद्रांक विभागाकडे या आर्थिक वर्षात दस्त नोंदणीतून मिळालेल्या महसुलाच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थावर मालमत्तांचे सर्वाधिक होत आहे, याची माहिती समोर आली आहे. वेगाने विकसित होत असलेला पुणे जिल्ह्यात गुंतवणुकीमध्ये प्राधान्य दिले जात आहे. औद्योगिकीकरण होत असल्याने त्याच परिसरात राहण्यास नागरिक पसंती देतात.
मुळशी, मावळ आणि खेड या तालुक्यातून मुंबईला प्रवास करणे सोयीचे होते. तसेच मावळ आणि खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले आहे. या तालुक्यांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे रोजगाराची संधी अधिक यामुळे या परिसरात घर खरेदीसाठी नागरिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. मावळ आणि मुळशी तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. डोंगर, नदी, धरणे, निसर्गसंपदा, हिलस्टेशन, हिरवाई नटलेला हा भाग आहे. त्यामुळे सेंकड होमसाठी नागरिक या परिसराला प्राधान्य देतात.
हिंजवडी आयटी-पार्कचा फायदा
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगत मुळशी तालुक्यातील काही गावे येतात. तेथेही मोठ्या प्रमाणावर नागरिकरण होत आहे. तसेच हिंजवडी आयटी-पार्कमुळे या परिसराचा चेहरा-मोहरा बदला आहे. लगतच्या गावांतही नागरिकरण झाले आहे. त्यामुळे या परिसरात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारांची संख्या वाढत असल्याचे मत प्रशासनातील जाणकरांचे मत आहे.