पाथर्डी -देव कोपला अन् बिबळ्याने एकाच राती गायीची तीन वासरे व म्हशीचे एक वगारू खाल्ले साहेब… कुणाला सांगावं हिकड़… कोण वाली हाय् आम्हा गरिबांचं… लै वाईट वखूत आलाय… कशाची नुकसान अन् कशाची भरपाई कोण ऐकून घेईना आमचं… डोंगराखाली समदीकडं शेत पिकल्यानं आता बांधाच्या कडानं पण जायचं भ्याव हाय… पण पर्याय नाई डोंगर उतरल्याशिवाय… खाली उतरून कुठे जावं अन् काय खाऊ घालावं या जित्रांबांना…. कोड सुटणासं झालयं… अशी व्याकुळतेने व्यथा मांडताना गुजरातमधून गिर गायींचा कळप चारण्यासाठी आलेल्या भीमा गायीवाल्याच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू तरळले…
करंजी परिसरातील घाटमाथ्यावर नगर व बीड जिल्ह्यांच्या सरहद्दीवर भीमाच्या गायींचा कळप पावसाळ्यात अनेक वर्षांपासून येत असतो. गुजरातमधून अनेक जण गायींचे कळप घेवून या परिसरात येत असतात. गायींना मुबलक चारा मिळावा, म्हणून अंतर राखत विखरून विविध भागात ठरलेल्या ठिकाणी हे पशुपालक थांबतात. त्यांच्या जोडीला स्थानिक मेंढपाळही असतात. भीमाच्या कळपात साधारणतः तीनशे गायी, काही म्हशी व मेंढ्या आहेत.
सुगीचे दिवस संपल्यानंतर जानेवारी महिन्याच्या सुरवातीला शेतातील पिके निघल्यानंतर हे कळप डोंगराखालील मोकळ्या शेतात चरण्यासाठी उतरतात. शेतकरीही तेव्हा शेत खतवण्यासाठी त्यांना आग्रहाने निमंत्रण देतात. यावर्षी मात्र वेळेआधिच सुनामी संकट कोसळले आहे. बिबट्याने गायींच्या कळपावर हल्ला करून मोठे नुकसान केले आहे. बिबट्याने तीन बालके ठार केल्यानंतर स्थानिकांसह परराज्यातील गुराखी प्रचंड भयभीत आहेत. स्थानिक ठिकाणच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्यांनी केलेले हल्ले थोडेफार चर्चेत येतात.