लातूर (प्रतिनिधी) – प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुलासाठी अर्ज केलेल्या 1 लाख 52 हजार 79 अर्जदारांपैकी 32 हजार 276 अर्ज हे सॉफ्टवेअरच्या तांत्रिक अडचणीमुळे अस्विकृत झाल्याचे समोर आले आहे. वास्तविक हे अर्जदार घरकुल योजेनसाठी पात्र आहेत. मात्र त्यांचा अर्ज सॉफ्टवेअरने स्विकारलेला नाही. अशा अस्विकृत झालेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करायला लावून घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत केली आहे.
सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे लातूर जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती घरकूलापासून वंचित राहू नये, याकडे शृंगारे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
सुधाकर शृंगारे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी लातूर जिल्ह्यातल्या 1 लाख 52 हजार 79 गरजू लोकांनी अर्ज केले होते. मात्र ऑनलाईन फॉर्म भरावयाच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे 32 हजार 276 जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
हे अर्ज अस्वीकृत झाल्याने लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. सॉफ्टवेअरच्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक लोक अपात्र ठरले आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणीचा फटका सामान्य लाभार्थ्यांना बसू नये. यासाठी सॉफ्टवेअरमध्ये तातडीने दुरुस्ती करून पात्र लोकांना घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.