कोल्हापूर – करोनाच्या पार्श्वभूमीवर खुल्या मैदानावर ऊस परिषद घेण्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19वी ऊस परिषद आता ऑनलाइन होणार आहे.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये सोमवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही परिषद ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
गेली 19 वर्षे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेतच ऊसाचा दर निश्चित केला जातो. त्यानंतर आंदोलन पेटते आणि तोडगा काढून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होतो. ऊस परिषदेला हजारो शेतकरी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर एकत्र येतात. त्यांच्या साक्षीने ऊसदराचा आकडा जाहीर केला जातो. यंदा करोनाचे संकट असल्याने ऊस परिषद होणार की नाही, याबाबत साशंकता होती. तरीही स्वाभिमानीने सोमवारी ऊस परिषदेची घोषणा केली.
करोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी ऊस परिषदेबाबत विचार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीत ऊस परिषद ऑनलाइन घ्यावी, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सुचविले. त्यानंतर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली आणि ऑनलाइन पद्धतीने परिषद घेण्याचे मान्य केले.
कोल्हापुरात तातडीची बैठक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळी ऊस दराबाबत आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत ऊस दराबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ऊस दराचा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता असून यावर तोडगा काढण्यासाठी उद्या तातडीने पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह कारखान्याचे आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत.