नवी दिल्ली – प्रत्येकाने मास्क परिधान केल्यास करोनाचा फैलाव रोखण्यास मोठा हातभार लागेल. त्यामुळे लस उपलब्ध होईपर्यंत दिल्लीकरांनी मास्कलाच लस समजावे, असा सल्ला दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी दिला.
देशाची राजधानी दिल्लीत मागील दोन दिवस विक्रमी संख्येने नवे करोनाबाधित आढळले. बुधवारी आणि गुरूवारी तेथील बाधितांमध्ये 5 हजार 600 हून अधिक संख्येची भर पडली. त्यामुळे दिल्लीविषयीची चिंता वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर, जैन यांनी मास्कच्या वापराची गरज अधोरेखित केली. लॉकडाऊनपेक्षाही मास्कच्या वापराचे फायदे अधिक आहेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दिल्लीतील बाधितांची संख्या एकाएकी वाढण्याबद्दल दिल्ली आणि केंद्र सरकारांकडून वेगवेगळी कारणे नमूद करण्यात आली आहेत. बाधितांच्या संपर्कातील लोकांचा वेगाने शोध घेतला जात आहे. चाचण्यांनाही गती देण्यात आली आहे, असा दावा दिल्ली सरकारकडून करण्यात आला आहे. तर, सणासुदीच्या हंगामामुळे होणारी गर्दी आणि खराब हवा आदी कारणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहेत.