पुणे: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात ह्रदय विकाराच्या झटक्यानंतर निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर सर्वच क्षेत्रातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली असून, माईंच्या मुलांवर शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबाबत माहिती दिली. यावेळी वैराळकर यांना सिंधुताई सपकाळ यांच्याशी काही बोलणे झाले होते का, त्या काय म्हणाल्या होत्या, असे विचारले. त्यावर माझी मुले कशी आहेत. माझ्या मुलांची काळजी घ्या, हाच विचार सिंधुताईंच्या मनात होता, असे वैराळकर यांनी सांगितले.
सिंधुताई यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी बोलणे झाले होते. माझ्या मुलांचे कसे आहे, त्यांचे सर्व व्यवस्थित सुरू आहे ना, मुलांची व्यवस्थित सोय राहू द्या. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सांभाळलेल्या हजारो मुलांची त्या चौकशी करत होत्या, असे सुरेशकुमार वैराळकर यांनी सांगितले.