दहिवडी – दहिवडीच्या इतिहासातील पाण्याचा दुष्काळ हा यावर्षीचा शेवटचा दुष्काळ असेल. यापुढे दहिवडीला दुष्काळ नसणार याची संपूर्ण व्यवस्था झाली आहे. जिहे-कटापूर योजनेचे काम पूर्ण होत असून आंधळी धरणातून दहिवडीच्या माणगंगा नदीतून पाणी पुढे जाणार आहे. फक्त पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार नाही तर पुढच्या वर्षापर्यंत शेती पाण्याचा प्रश्न मिटवून शेतात पाणी पोहोचवणार आहे, असे प्रतिपादन आमदार गोरे यांनी केले.
दहिवडी नगरपंचायतीस मंजूर करण्यात आलेल्या केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत 49 कोटी 63 लक्ष निधीच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या शुभारंभ व कोनशीला अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सागर पोळ, भाजपा मंडळाध्यक्ष शिवाजी शिंदे, गणेश सत्रे, माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव, साधना गुंडगे, दिलीपराव जाधव, नगरसेवक रुपेश मोरे, सयाजी मोरे, उज्ज्वला पवार, राणी अवघडे, महिला व बालकल्याण सभापती निलम जाधव, नगरपंचायत मुख्याधिकारी कपिल जगताप, ज्येष्ठ नेते भास्करराव गुंडगे, माजी सभापती अतुल जाधव, माजी जि. प. सदस्य अरुण गोरे, सिद्धार्थ गुंडगे, सोमनाथ भोसले, डॉ. संदीप पोळ, अतुल जाधव, शैलेश खरात, मुन्शी शेख, महेश कदम पंढरीनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, विकासाच्या कामासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र येवूयात. यासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवून विकासकाम करूयात. कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांनी मला विकासकाम मागितल्यास त्यांना त्त्यांच्या प्रभागात निधी जाईल. विकास करण्यासाठी मन मोठ लागत टिल्लू मन कामाच नाही. दिलेला शब्द पूर्ण करण्याची माझी भूमिका कायम राहील, त्या वचनपूर्तीस कटिबध्द आहे. नगराध्यक्ष सागर पोळ म्हणाले, दहिवडी नगरपंचायत अमृत २.० योजनेंतर्गत ४९ कोटी ६३ लक्ष निधीची योजना पूर्ण करीत असतांना अनेक अडचणी निर्माण झाल्या. सर्व अडचणीवर मात करून ही घराघराच्या जिव्हाळ्याची पाणी योजना पूर्णत्वास जात असतांना मला विशेष आनंद वाटत आहे.
आ. गोरे राष्ट्रवादीवर टीका
केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 योजनेचा भूमिपूजन समारंभ होणार असल्याचे समजतात राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी घाई गडबड करत न केलेल्या कामाचे भूमिपूजन करायला गडबड केली. परंतु संपूर्ण माण खटाव तालुक्याला माहित आहे की योजना आमदार जयकुमार गोरे यांनी मंजूर करून आणली आहे. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने एक रुपयाचे विकासकाम केलेले नाही. तरीदेखील माणच्या राष्ट्रवादीची न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची सवय अजून गेलेले नाही, असे टीकास्त्र आ. गोरे यांनी सोडले.