मुंबई : गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सोबत सोडण्याची मागणी आम्ही केली होती, पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही”, असे म्हणत गजानन किर्तीकर यांनी पक्षाला रामराम ठोकला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे बोलत उत्तर दिले आहे.
संजय राऊतांनी गजानन किर्तीकरांवर शेलक्या शब्दांत टीका करत “किर्तीकर आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षानं त्यांना काय दिलं नाही? पाच वेळा आमदार होते, दोन्ही मंत्रीमंडळात ते मंत्री राहिले. पक्षाकडून दोनदा त्यांना खासदारकी मिळाली. त्यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर हे कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्षासोबत आहेत.पण सर्व काही भोगलेले किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी एक वेगळी भावना निर्माण होते. यामुळे फार काही सळसळ झाली नाही. ठीक आहे गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील”, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच पुढे बोलताना,” तुम्ही गेलात, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण हा पक्षाला कोणताही धक्का नाही. १८ पैकी १३ तिकडे गेले असले, तरी काय झालं? त्यांना पुन्हा निवडूनही यायचं आहे ना? त्यांच्यापैकी किती निवडून येतात बघून घेऊ ना”, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, अमोल किर्तीकर यांनी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, असे संजय राऊत म्हणाले. “अमोल किर्तीकरने त्याच्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. अमोल किर्तीकर आजही शिवसेनेसोबत आहे आणि राहील”, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेत आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “न्यायाची व्याख्या काय आहे? मला तर जेलमध्ये टाकलं, तरी मी पक्षासोबत आहे. संकटात जो पक्षासोबत, आपल्या कुटुंबासोबत राहतो, त्याला निष्ठा म्हणतात”,असे राऊत यावेळी म्हणाले.