नवी दिल्ली- “जनतेमध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असून त्यासाठी हा अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना म्हटले आहे. तसेच जनेतवर आमचा पूर्ण विश्वास आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना देखील बुधवारी चोख उत्तर दिले. मणिपूरच्या मुद्द्यावरुन लोकसभेत सुरु असणाऱ्या चर्चेवर शहांनी सरकारची बाजू लोकसभेत मांडताना ते बोलत होते.
शहा यावेळी बोलताना पुढे म्हणाले, दोन वेळा आम्ही बहुमताने निवडून आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान असल्याचे अनेक अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सरकारने आपल्या नऊ वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही हटवली. त्यामुळे या अविश्वास प्रस्तावावर कोणालाच विश्वास नाही. जनताही हे सगळे बघत आहे. सर्व दिसत असल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही आणि तो होणारही नाही.
सत्तेसाठी “युपीए’ची धडपड
शहांनी यावेळी बोलताना विरोधी आघाडी “इंडिया’चे नामोल्लेख करण्याचे टाळले. ते म्हणाले, अविश्वास प्रस्तावाला आमचा कोणताही आक्षेप नाही. पण स्वत:चे सरकार वाचवण्यासाठी भ्रष्टाचार करणे हे युपीएचे वैशिष्टये आहे. पंतप्रधान मोदींनी “भ्रष्टाचार छोडो भारत, राजवंश छोडो भारत आणि तुष्टीकरण छोडो भारत’चा नारा दिला आहे. त्यामुुळे सत्तेचे रक्षण करणे व ती मिळविण्यासाठी वाट्टेल ते करणे हे युपीएचे खरे वैशिष्ट आहे.