नवी दिल्ली – आमदार करुणाकर रेड्डी यांना देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपतीच्या बोर्डाचे अध्यक्ष बनवल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. याचे कारण म्हणजे करुणाकर रेड्डी यांचे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करते. आंध्र सरकारच्या या निर्णयावर तेलगू देसम पार्टी (टीडीपी), भाजप आणि अनेक विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
टीडीपीचे राज्य सचिव बुची राम प्रसाद यांनी हिंदू धर्मावर विश्वास नसलेल्या व्यक्तीला मंदिराचा अध्यक्ष कसा बनवता येईल, असा सवाल केला. प्रत्येकाला माहिती आहे की, ते ख्रिश्चन धर्म मानतात. त्यांचे ख्रिश्चन लोकांशी संबंध आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार झाले होते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डी पुरंदेश्वरी यांनीही या पदावर हिंदू धर्म मानणाऱ्यांनीच बसावे, असे म्हटले आहे. सरकार या पदाचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचे शासनाच्या निर्णयावरून सिद्ध होते, असे त्यांनी म्हटले.
दुसऱ्यांदा होणार ट्रस्टचे अध्यक्ष
करुणाकर रेड्डी 10 ऑगस्ट रोजी तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांना हे पद सोपवण्याची ही दुसरी वेळ आहे. जगन मोहन रेड्डी यांचे वडील वाय.एस. राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना करुणाकर रेड्डी यांना 2006-2008 दरम्यान ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. तिरुमला येथील श्री. व्यंकटेश्वर मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. त्यांच्याकडे अडीच लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये 10.25 टन सोने आणि 3,000 कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न समाविष्ट आहे. दरवर्षी 1,500 कोटी रुपये हुंडी संकलन किंवा भक्तांच्या देणग्यांद्वारे जमा होतात.