डॉ. सुभाष राठोड
राजभाषा मराठीचा सन्मान म्हणून दरवर्षी 27 फेब्रुवारीला “मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करतो. कवी, नाटककार, कादंबरीकार, मराठी साहित्याचा मानदंड विष्णू वामन शिरवाडकर अर्थात “कुसुमाग्रज’ यांना 1987 साली त्यांच्या एकूण साहित्यिक कामगिरीचा गौरव म्हणून 23 वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून जाहीर केला. त्यानिमित्त मराठी भाषा कशी बहरत गेली त्याचा धावता आढावा…
इ. स. 11व्या शतकाच्या आधीच शिलालेख आणि ताम्रपटांमधून मराठीची प्राचीन रूपे दिसू लागतात. संतांचे अभंग, कीर्तने, भारूडे, शाहिरांचे पोवाडे, लावणी, फटका, बखरी इत्यादींनी ती सजली आहे. “अमृतांतेही पैजा जिंकणारी’ श्रीमंत व प्रभावी असा आपल्या मराठीला एक हजाराहून अधिक वर्षांचा जिता-जागता इतिहास आहे. मराठीतील आद्य शिलालेख म्हणजे अक्षीया शिलालेख. हा शिलालेख शके 934 म्हणजे इसवीसनाच्या 1022 मधील शिलाहार वंशीय राजा केसी देवराय यांचा प्रधान भूईर्जू सेणुई यांच्या काळात कोरला गेला. रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील अक्षी हे गाव असून अक्षीच्या शिलालेखात देवीकरीता नऊ कुवली धान्य अर्पण केल्याचा उल्लेख आढळून येतो.
इ. स. 1250 नंतर देवगिरीच्या यादव राजांच्या काळात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि याच काळात महानुभाव पंथियांच्या विविध ग्रंथरूपाने मराठीच्या दालनात साहित्याची मांदियाळी सुरू झाली. महानुभाव पंथीय म्हाइंभट हे मराठीतील आद्य ग्रंथकार व आद्य चरित्रकारही. त्यांनी “लीळाचरित्र’ या ग्रंथात चक्रधरांच्या अनेक आठवणी व रोजच्या घटना-प्रसंगांचा रोचक भाषेत आढावा घेतलेला आहे. “धवळे’ नावाची रचना करणारी महदंबा अर्थात महादाईसा ही आद्य कवयित्री याच काळातील. महाराष्ट्र ही संतांची भूमी. महाराष्ट्राचं भूषण असलेल्या संत परंपरेचा विठ्ठल नामाचा गजर करीत समाजातील विषमता, भेदभाव नष्ट करून आध्यात्मिक लोकशाही स्थापण्याचे मोठे सामाजिक कार्य केले. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम आदी संतांनी विविध प्रकारची रूपके वापरून मराठीत सरस अशी अभंगरचना केली. वेगवेगळ्या जातीतल्या संतांनीही मराठीमध्ये उत्तम साहित्य रचना केली. नामदेव शिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखामेळा, सेना न्हावी तसेच कान्होपात्रा यांच्यासह जनाबाईंसारख्या स्त्री-संतांनी देखील भक्तिपर काव्यरचना केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी भाषेला राजमान्यतेबरोबरच संतांच्या वाङ्मयीन कार्यामुळे लोकमान्यताही मिळायला लागली. स्वराज्य स्थापनेपासून ते पेशव्यांच्या कारकिर्दीपर्यंत अनेक शाहीर व पंडित कवींनी मराठी भाषेची सेवा केली. रामजोशी, प्रभाकर, सगनभाऊ, होनाजी बाळा, अनंत फंदी इत्यादी शाहिरांची वाणी मराठी साहित्य दरबारात ठसकेबाज शब्दांमुळे प्रेरणादायी वर्णन करू लागली. वीररसाबरोबरच शृंगाररसाने ओतप्रोत सजलेल्या लावण्या लिहून शाहीर फड गाजवू लागले. मराठी शाहिरांच्या काळात आणखी एक वाङ्मय प्रकार मराठीत बहरास आला तो म्हणजे “बखर’. ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत वाचायला मिळते. बखर वाङ्मय विशेषत्वाने इ.स. 1760 ते 1850 च्या दरम्यान बहरलेला दिसतो. या कालखंडापासून संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रातही परिवर्तनाचे वारे वाहू लागले.
मुख्य म्हणजे याच सुमारास 1556मध्ये भारतात मुद्रणकला आली. महाराष्ट्रात मुद्रणकलेची सुरुवात 1812 मध्ये झाली. छपाई तंत्रज्ञानाच्या शोधामुळे प्रबोधनाच्या युगाचा प्रारंभ झाला. ज्ञानाचा प्रसार होण्यास मोठी मदत झाली. याचा साहित्य व भाषेवरही दूरगामी परिणाम व्हायला लागले. इंग्रजी भाषेच्या परिचयामुळे वैचारिक निबंध व वृत्तपत्रीय लेखनाची दमदार सुरुवात या कालखंडामध्ये झाली. मराठीतील पहिले वृत्तपत्र “दर्पण’ या नावाने बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारीत 1832 रोजी सुरू केले. त्याच्या पुढील काळात टिळक-आगरकरांचं परखड वृत्तपत्रीय लेखन सुरू झाले. या काळात मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून संपन्न होऊ लागली. पाठ्यपुस्तके लिहिण्यास सुरुवात झाली. विविध ज्ञानशाखांच्या आधारे अनेक लेख व ग्रंथ या काळात प्रकाशित होऊ लागले.
मराठी साहित्यातील या काळातील देणगी म्हणजे कादंबरी वाङ्मय. बाबा पद्मनजी यांनी 1857 मध्ये “यमुना पर्यटन’ ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी लिहिली. याच सुमारास हरिनारायण आपटे युगाचा प्रारंभ झाला. “पण लक्षात कोण घेतो?’ ही आपट्यांची गाजलेली कादंबरी.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आणखी एका साहित्य प्रकाराने मराठी साहित्याला भुरळ घातली ती म्हणजे संगीत रंगभूमी. संगीत सौभद्र- अण्णासाहेब किर्लोस्कर, कृ. प्र. खाडिलकर यांचे संगीत मानापमान, संगीत शारदा, संशयकल्लोळ- गो. ब. देवल इ. अजरामर संगीत नाटके मराठी रंगभूमी उत्तरोत्तर बहरतच राहिली. पौराणिक कथांचा आधार घेत ही नाटके लोक प्रबोधन आणि मनोरंजनही करायला लागली.
इंग्रजी भाषा शिकून इंग्रजीतील साहित्याने प्रभावित झालेल्या पहिल्या पिढीतील कवींनी भावगीतात्मक, प्रणयप्रधान व सामाजिक विचार असणारी अशा कवितांचा मुक्ताविष्काराला सुरुवात केली. कवी केशवसूत हे त्यापैकीच एक. “तुतारी’, “नवा शिपाई’ यासारख्या त्यांच्या कवितांतून नवीन युगाची तुतारी फुंकली.
1945 हे साल अर्वाचीन साहित्याचं “क्रांतिपर्व’ म्हणून ओळखलं जातं. स्वातंत्र्यानंतर देशाची झालेली फाळणी, बेकारी, महागाई, अराजकता इत्यादींचा आविष्कार नवकाव्याचे जनक बा. सी. मर्ढेकर यांनी “पिपात मेले ओल्या उंदिर’, “बडवीत टिपऱ्या’ यासारख्या कवितांतून केला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात दलित, ग्रामीण समाजाच्या दुःखाचे हुंकार मराठी साहित्याच्या दालनात पुढे पुढे अधिक गडद होत गेले. परंतु, आज इंग्रजीच्या वाढत्या रेट्यांमुळे आणि आपली मुले मराठी माध्यमात शिकली तर मागे राहणार नाही ना? या बदत्या मानसिकतेमुळे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या हजारो मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जा बहाल करून हे प्रश्न सुटणार नाहीत, तर बदलत्या परिस्थितीचा विचार करून आपले भाषिक धोरण पुन्हा नव्याने ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे.