मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची उत्सुकता अवघ्या देशाला लागून राहिली होती. आज या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हे कल हाती आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वातावरण बदलले असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना “हा सगळ्यांसाठी एक संदेश आहे की मोदी है तो मुमकिन है असं काहीही नसतं. मोदींनाही हरवता येऊ शकतं”, असा उल्लेख सुषमाअंधारेंनी केला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत सुषमा अंधारेंनी कर्नाटक निवडणूक निकालांचा महाराष्ट्रावर होऊ शकणारा परिणाम सांगितला आहे. “महाराष्ट्रावर याचा परिणाम म्हणजे ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी तिथे जाऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, गरज नसताना बजरंग बलीचा मुद्दा फडणवीसांनी काढला. या सगळ्याचा तिथे अजिबात फायदा झाला नाही. त्यामुळे आता असे कार्ड ते महाराष्ट्रात वापरताना दहा वेळा विचार करतील”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
“जे कार्ड कर्नाटकात चालले नाहीत, फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात लोक हे कार्ड अजिबात चालू देणार नाहीत. नक्कीच लोक यातून धडा घेतील की बजरंग बली हा राजकारणाचा विषय असू शकणार नाही. तो आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. पण भाजपा जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरते, तेव्हा ती धर्म आणि महापुरुष यांच्यामागे लपायचा प्रयत्न करते”, अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी भाजपावर हल्लाबोल केला.