U19 World Cup Final : संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करूनही पुन्हा एकदा भारतीय संघ विजेतेपदापासून वंचित राहिला. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणे, 2024 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतही टीम इंडिया संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली, परंतु अंतिम फेरीत विजय मिळवू शकला नाही. मात्र, यावेळी भारताला त्यांच्याच एकाने दुखावले. खरं तर, एक ‘भारतीय’ हे अंडर-19 विश्वचषकात टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले.
‘हरजस सिंग’ (Harjas Singh) असे या भारतीयाचे नाव आहे. संपूर्ण विश्वचषकात हरजस सिंग बॅटने काही चमत्कार करू शकला नाही. फायनलपूर्वी 6 सामन्यात हरजसच्या नावावर फक्त 49 धावा होत्या, पण ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. अंतिम फेरीतही कर्णधार आणि व्यवस्थापनाने त्याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला. यावेळी हरजसने ऑस्ट्रेलियन कॅम्पची निराशा केली नाही. पण त्याने भारताचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंग केले.
23व्या षटकात 100 धावांच्या आत कांगारूंनी 3 विकेट गमावल्या, तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ 200 धावाही गाठू शकणार नाही असे वाटत होते, पण त्यानंतर भारतीय वंशाचा हरजस सिंग मैदानात उतरला. हरजसने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 55 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. हरजसच्या या खेळीने ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला.
हरजसने केवळ 55 धावा केल्या नाही तर संघाची एक बाजू संभाळून धरली आणि रायन हिक्ससोबत चौथ्या विकेटसाठी 66 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हरजस पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा संघाची धावसंख्या 200 च्या जवळ होती. हरजसच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सात गडी गमावून 253 धावा केल्या.
#U19WorldCup #AUSvsIND Final : 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले…
विजेतेपदाच्या सामन्याचा लेखाजोखा..
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 253 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मात्र, अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासातील अंतिम फेरीतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांत 174 धावा करून सर्वबाद झाला. भारताच्या सात खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सलामीवीर आदर्श सिंगने सर्वाधिक 47 धावांची तर आठव्या क्रमांकावर असलेल्या मुरुगन अभिषेकने 42 धावांची खेळी खेळली. तर ऑस्ट्रेलियाकडून महाली बियर्डमन आणि राफे मॅकमिलन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.