मुंबई – आज (बुधवार,दि.23) अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी नेल्याप्रकरणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम सुरू झाले असल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
“हा आणखी एका सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टींची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील आहे”, ( Jayant Patil on Nawab Malik’s ED inquiry) अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित जाणीवपूर्वक अडचणीत त्यांना आणण्याचे काम केले जात आहे. वेळोवेळी आवाज उठवला म्हणून कदाचित नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचे काम होत असेल, असेही जयंत पाटील म्हणाले.