Lok Sabha Election 2024 । jayant patil : देशात लोकसभा निवडणूक लागल्या असून आता सर्वपक्षाने आपल्या उमेदवारांना रिंगणात उभे केले आहे. त्यातच राज्यातही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यास गुरुवारी (दि. 18) सुरुवात झाली.
त्यात जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. आज पुण्यात सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या लोकसभा निवडणुकीसाठी आपापले उमेदवारी अर्ज भरले.
यामध्ये बारामतीसाठी सुप्रिया सुळे, शिरूरसाठी अमोल कोल्हे आणि पुण्यासाठी रविंद्र धंगेकरांकडून अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे रास्ता पेठेमध्ये शांताई हॉटेल समोर प्रचार सभा पार पडली. । Lok Sabha Election 2024 । jayant patil
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मोठे नेते याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी आघाडीतील नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा पुण्यात झाल्या. महाविकास आघाडीच्या सभेसाठी पोलिसांनी जी जागा दिली ती खूपच अपुरी होती. आमच्या तीन पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत हे माहित असतानाही पोलिसांनी मोठी जागा दिली नाही.
पोलिसांनी आम्हाला जरा छोट्या जागेची व्यवस्था केली आहे. पदोपदी होणाऱ्या अन्यायाकडे पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे. जागा नसल्याने आमचे उमेदवार रस्त्यावर बसले आहेत. काही हरकत नाही दिवस बदलत असतात हे लक्षात ठेवा,
असंही पाटील मिश्किलपणे म्हणाले. स्टेजवर जागा कमी असल्याने निवडणुकीतील उमेदवार सुप्रिया सुळे, रविंद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे स्टेजसमोरील जागेत खाली बसले होते. त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे.
सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल….
दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. “शरद पवारही आमच्याकडे येणार होते पण ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलला”, असा दावा फडणवीसांनी केला होता.
त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस खरं बोलले यासाठी मी त्यांचे आभार मानते. काश्मीर ते कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे, त्यांना शरद पवार किंवा आमच्या कुणाही विरोधात षडयंत्र करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नव्हता,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“येणारा काळ हा रवींद्र धंगेकरचा असेल….’; धंगेकरांची डरकाळी
यावेळी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, “आज सगळ्यात मोठा दिवस आहे. मी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्यांला कॉंग्रेसने मोठी संधी दिली आहे.
त्यामुळे येणारा काळ रवींद्र धंगेकरचा असेल. मी पुणेकरांचा उमेदवार आहे. पुणेकरांसाठी मत मागत आहे आणि पुणेकरच जिंकणार आहेत. मागील 30 वर्षांपासून पुण्याचे राजकारण जवळून पाहिले आहे.
नगरसेवकापासून तर लोकसभेच्या निवडणुकीप्रर्यंत कशाप्रकारे विरोधक यंत्रणेचा वापर करतात हे पाहिले आहे. त्यामुळे वेळ आली की खुल्या मनाने कोणाला किती मते पडणार हे सांगेन.
विरोधकांचे सगळे प्रयोग माझ्या डोळ्यासमोर झाले आहे. त्याचे हे प्रयोग कसे बंद करायचे हे मला माहिती आहे’, असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला आहे.