नवी दिल्ली – अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी मणिपूर हिंसाचाराचा निषेध केला असून त्यांनी भारताने मदत मागितल्यास या प्रकरणी अमेरिका भारताला मदत करण्यास तयार आहे असे म्हटले होते.
त्यावर कॉंग्रेस पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे. कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दात सांगावे की अमेरिकेची मणिपुरच्या स्थिती बाबत कोणतीही भूमिका नाही, तेथील स्थिती पूर्ववत करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारवर आहे.मणिपुरची समस्या ही भारताची अंतर्गत समस्या असून ती भारताने संवेदनशीलपणे हाताळली पाहिजे.पण पंतप्रधान मोदींनी या प्रश्नावर मौन बाळगले आहे. पंतप्रधान गप्प आहेत आणि गृहमंत्री कुचकामी ठरले आहेत. पण याचा अर्थ अन्य देशांनी यात हस्तक्षेपकरावा असा नाही, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
दरम्यान भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंदम बागची यांनी अमेरिकन दुताच्या वक्तव्यावर सौम्य शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, विदेशी मुत्सद्दी सहसा भारतातील अंतर्गत बाबींवर भाष्य करीत नाहीत.