मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमरदारांसह बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच झाली. काल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या आता शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली आहे. ‘चार -पाच महिन्यांसाठी पद राहावं म्हणून जर कोणी अशा प्रकारची बेईमानी करत असेल, तर आम्ही त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहतो’, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असती तर त्या राजीनामा देऊन गेल्या असत्या. त्यांना आतापर्यंत मिळालेलं प्रत्येक वैधानिक पद हे फक्त शिवसेना आणि ठाकरे यांच्यामुळे मिळाले आहे. पाच-पाच वेळा ज्यांना आमदारकी मिळाली, महिला आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं, विधान परिषदेचं उपसभापती पद दिलं गेलं, ही सगळी पदं मिळाल्यावरही जर एखादी व्यक्ती पक्ष सोडून जात असेल, त्याची कारणं काहीही असतील. मला त्यांची लाज वाटते. या महाराष्ट्रालासुद्धा त्यांची लाज वाटते. ज्या विचारसरणीतून त्या शिवसेनेत आल्या होत्या. तरीसुद्धा त्यांना आम्ही जे जे हवं ते सगळं दिलं. पण चार-पाच महिन्यांसाठी पद राहावं म्हणून जर कोणी अशा प्रकारची बेईमानी करत असेल तर आम्ही त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहतो.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे. याशिवाय युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाची गळतीचे सत्र सध्या सुरूच असल्याचे यातून दिसत आहे.