केजरीवालांनी पंतप्रधान मोदींवर चढवला जोरदार हल्ला
नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या विरोधात ईडीचा वापर करून मुद्दाम खोडसाळ बातम्या टीव्हीवर प्रसृत केल्या जात असल्याचे नमूद करीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले आहे की, सिसोदिया यांच्यावरील ईडीच्या छाप्यात काहीही सापडलेले नसताना ईडीने त्यांची 52 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली असल्याची बातमी काल पासून टीव्हीवर दाखवली जात आहे. हा सरळसरळ खोडसाळपणा आहे असेहीं केजरीवाल यांनी म्हटले आहे.
ईडीने सांगितले म्हटले आहे की त्यांनी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण गैरव्यवहार प्रकरणात तात्पुरत्या स्वरुपात 52 कोटी 24 लाख रूपयांची मालमत्ता जप्त केली असून ही मालमत्ता सिसोदिया, अमनदीप सिंग धल्ल, राजेश जोशी, गौतम मल्होत्रा आणि इतर यांच्या मालकीची आहे.
ईडीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “पंतप्रधान, तुम्हाला मनीष सिसोदियाविरुद्ध काहीही सापडले नाही, तेव्हा तुम्ही ईडीच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे, तुमची ईडी संध्याकाळपासून टीव्ही चॅनेलवर खोट्या बातम्या चालवत आहे की मनीष सिसोदिया.
सिसोदिया यांची 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यांनी ट्विटरवर ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात म्हटले आहे की, ईडीने 2018 पूर्वी सिसोदिया यांची केवळ 80 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.उत्त्पादन शुल्क घोटाळा चर्चेला येण्यापुर्वीचे हे प्रकरण आहे. पंतप्रधान मोदींवर आणखी निशाणा साधत केजरीवाल यांनी म्हटले आहे की, राजकीय प्रतिस्पर्ध्यांची बदनामी करण्यासाठी पंतप्रधान खोट्या गोष्टींचा अवलंब करतील असे आम्हाला कधीच वाटले नव्हते.
लोकांनी कधीच विचार केला नव्हता की असा दिवस येईल की भारतासारख्या महान देशाला असा पंतप्रधान मिळेल, जो आपल्या राजकीय विरोधकांबद्दल उघडपणे खोटे बोलून त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करेल. खरे भ्रष्टाचारी कोण आहेत हे मोदींना चांगलेच माहिती आहे, तुमच्यात हिंमत असेल तर त्यांना पकडा, असे आव्हानही केजरीवाल यांनी दिले आहे.