नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीयांची भेट घेतली यावेळी राहुल गांधी यांनी तिथल्या भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी बोलताना, “काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला होता. मी पण प्रवास करत होतो. भारतातील राजकारणाची सामान्य साधने (जसे की जाहीर सभा, लोकांशी बोलणे, रॅली) काम करत नाहीत हे आपण पाहिलं होतं. राजकारणासाठी आवश्यक असलेल्या साधनांवर भाजपा आणि आरएसएसचे नियंत्रण आहे. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत.” असा आरोप यावेळी त्यांनी केला
पुढे बोलताना राहुल गांधी यांनी,”एजन्सी वापरल्या जात आहेत. अशा परिस्थितीत भारतात राजकारण करणं आता सोपं राहिलेलं नाही, असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही प्रवास करण्याचं ठरवलं.” असे म्हटले. तसेच “जग इतके मोठे आहे की कोणीही विचार करू शकत नाही की त्याला प्रत्येकाबद्दल सर्व काही माहीत आहे. हा एक आजार आहे की भारतात असे काही लोक आहेत ज्यांना वाटते की त्यांना सर्वकाही माहीत आहे. मला वाटतं की त्यांना देवापेक्षा जास्त माहिती आहे. ते देवासमोर बसून त्याला काय चालले आहे ते समजावून सांगू शकतात. पंतप्रधान मोदी देखील त्यापैकी एक आहेत.”असे म्हणत जोरदार निशाणा साधला.
“मला वाटतं जर पंतप्रधान मोदींना देवासमोर बसायला सांगितलं तर ते ब्रह्मांडात काय चाललंय ते देवाला समजावून सांगू लागतील. देव देखील त्याने काय निर्माण केलं आहे याबद्दल गोंधळून जाईल. भारतात हेच चालू आहे. भारतात असे काही लोक आहेत ज्यांना सर्वकाही माहीत आहे.
जेव्हा ते शास्त्रज्ञांकडे जातात तेव्हा ते त्यांना विज्ञानाबद्दल सांगतात, जेव्हा ते इतिहासकारांकडे जातात तेव्हा ते त्यांना इतिहासाबद्दल सांगतात. ते सैन्याला युद्ध, हवाई दलात उड्डाण करण्याबद्दल सर्व काही सांगतात. पण त्यांना काहीच कळत नाही हे सत्य आहे. कारण जर तुम्हाला कोणाचे ऐकायचे नसेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच कळू शकत नाही” असंही राहुल गांधींनी म्हटले आहे.