पवन गरुड
नेवासाफाटा -पोलिसांना कधीच सुट्टी नसते, कोणताही सण अथवा संकट असले तरीही स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र परिश्रम पोलीस कर्मचारी घेतात. त्यामुळे घराबाहेर पडून पोलिसांचा त्रास वाढवू नका, या विनंतीबरोबरच पोलीस कर्मचाऱ्याची बायको असल्याचा आपल्याला अभिमान आहे, अशी भावना नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉ. अंबादस गीते यांच्या पत्नी रुक्मिणी गिते यांनी व्यक्त केल्या.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि जनता यांच्यातील कर्तव्य व जबाबदाऱ्या विषद करणारे एक अनावृत्त पत्र गिते यांनी लिहून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. त्यात त्यांनी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची व्यथा त्याचबरोबर राष्ट्रीय कर्तव्याचे भान यांची सांगड घातली आहे. या पत्रात पती विषयी काळजी करणारा भाग असला तरी प्रथम कर्तव्य नंतर कुटुंब आहे, हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. करोनामुळे ज्यादिवशी जनता कर्फ्यु होता. तो 22 मार्चचा दिवस आणि त्यानंतर 23 मार्च ते 14 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन, पुन्हा त्यात वाढ होवून पुढे 3 मेपर्यंत लॉकडाऊन. पोलीस म्हटंल, की सारखी धावपळ चालूच असते.
22 मार्च पासून ते आजपर्यंत पोलीस कर्मचारी अहोरात्र पळत आहेत.आपलं घर, स्वतःच्या कुटुंबाचा कसलाही विचार न करता जनतेसाठी परिश्रम घेत आहेत. पोलिसांना कोणत्याही सणाला सुट्टी नसते. आता तर करोनाने त्यांची झोपच उडविली आहे. मात्र काही मंडळी जाणीवपूर्वक घराबाहेर फिरून त्यांचा त्रास वाढवत आहेत. करोनामुळे अगदी ड्युटी संपल्यावर स्वतःच्या घरात जायाची भीती पोलीस कर्मचाऱ्याला वाटत आहे. बायका – मुलं गावी सोडुन यावं तर हॉटेल, खानावळी बंद असल्याने मग जेवणार कुठे? हा प्रश्न आहेच.
एकंदरीत खूप वाईट परिस्थिती आहे. आम्ही पोलिसांच्या बायका असलो तरी आमचंही मन इतरांसारखाच आहे ना? आम्ही काय पोलादाचे बनलो आहोत का ? पोलिसांसुद्धा इतरांसारखे घरी बसवेसे वाटत नसेल का ? एक विचार करा की, आपल्याला आजार होऊ नये, म्हणून आपण घरात राहून सुद्धा किती काळजी घेतो. पण पोलिसांचे काय? ते बिचारे रस्त्यावर उभे राहून हजारो लोकांना तोंड देतात. पोलीस जनतेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिक विनंती आहे की, घरीच रहा, सुरक्षित रहा, आपल्या कुटुंबाची आणि गावाची सुरक्षा आता आपल्याच हातात आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा, गर्दीत जाण्याचे टाळा, घराची आणि समाजाची काळजी घ्या.
घाबरून जाऊ नका.आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण करोनावर नक्कीच मात करू शकतो. नागरिकांनो आता तरी जागे व्हा, हीच वेळ माणसातील देवपण शोधण्याची, करोनाशी लढण्याची, पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, वीज कर्मचारी यांना सहकार्य करा. करोना एक अशी शर्यत आहे की जिथं धावणारा नाही तर थांबणाराच जिंकणार आहे. आपण थांबु यात-करोना थांबेल, असे आवाहन गिते यांनी पत्राच्या माध्यमातून केले आहे.